राज्यातील धरणांमध्ये २८ टक्के पाणीसाठा

जून महिन्यात पावसाने सरासरी गाठली, तसेच जुलै महिन्यातही पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
jayakwadi dam
jayakwadi dam

पुणे : जून महिन्यात पावसाने सरासरी गाठली, तसेच जुलै महिन्यातही पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये यंदा तब्बल ४०२.९५ टीएमसी (२८ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच तारखेला सर्व प्रकल्पांमध्ये केवळ १२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मॉन्सून हंगामात चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने गतवर्षीप्रमाणे यंदाही सर्व प्रकल्प ओसंडून वाहण्याची अपेक्षा आहे.  

 विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार करता यंदा जून महिन्यातच राज्यातील सर्वच विभागांमध्ये पाणीसाठा वाढू लागला, तर जुलै महिन्यात पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. सातत्याने दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यात सध्या २६ टक्के पाणीसाठा आहे. तर पश्‍चिम विदर्भातील अमरावती विभागात २५ टक्के, पूर्व विदर्भाच्या नागपूर विभागात ४१ टक्के, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागात सुमारे २६ टक्के पाणीसाठा आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभाग भागात २३ टक्के आणि कोकण विभागात ४३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालावरून दिसून येते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील धरणांमध्ये यंदा १६ टक्के जादा पाणी शिल्लक आहे. पावसाने सातत्याने हजेरी लावल्यास पाणी पुरवठा करणाऱ्या नदी, नाले, ओढे, झरे वाहते राहणार असून, धरणांची पाणीपातळी झपाट्याने वाढणार आहे. गतवर्षी मराठवाड्यासह आणि विदर्भात पाणीसाठ्याची स्थिती खूपच खालावली होती. जुलै महिन्यात मराठवाड्यात अवघे १ टक्के, तर नागपूर, अमरावती, नाशिक विभागात प्रत्येकी ८ टक्के, कोकणात ४२ टक्के तर पुणे विभागातील धरणांमध्ये १५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. 

मराठवाड्यात चांगली स्थिती सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यात यंदा चांगला पाणीसाठा उपलब्ध आहे. मराठवाड्यातील ९६४ लहान मोठ्या प्रकल्पांमध्ये ६७.५९ टीएमसी (२६ टक्के) पाणी आहे. विभागातील मोठ्या ४५ प्रकल्पांमध्ये ५८.४१ टीएमसी (३७ टक्के), मध्यम ८१ प्रकल्पांमध्ये ५.५१ टीएमसी (१५ टक्के), तर लहान ८३८ प्रकल्पांमध्ये ३.६७ टीएमसी (६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील मांजरा (बीड), सिना कोळेगाव (उस्मानाबाद) ही धरणे अद्यापही अचल पाणीसाठ्यात आहेत. जायकवाडी धरणात ३०.८२ टीएमसी (५५ टक्के) चल पाणीसाठा आहे. धरणातील अचल पाणीसाठा विचारात घेता ५६.८८ टीएमसी पाणीसाठा आहे. 

पुणे विभागातील धरणात २३ टक्के पाणी पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील प्रमुख धरणांमध्ये सध्या १२०.९६ टीएमसी (२३ टक्के) पाणीसाठा झाला आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत जवळपास ७ टक्के पाणीसाठा अधिक आहे. उजनी धरणाचा पाणीसाठा अचल पातळीत आहे. मात्र एकूण अचल पातळीचा विचार करता धरणात उजनीत ५८.७३ टीएमसी पाणीसाठा आहे. तर कोयना धरणाच्या चल आणि अचल पातळीत मिळून ३५.६१ टीएमसी पाणीसाठा आहे. विभागातील ३५ मोठ्या प्रकल्पांमध्ये १००.७० टीएमसी (२३ टक्के), मध्यम ५० प्रकल्पांमध्ये १५.२३ टीएमसी (३२ टक्के) आणि लहान ६४१ प्रकल्पांमध्ये ५.०३ टीएमसी (१५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. नाशिक विभागातील पाणीसाठ्यात वाढ नाशिक विभागातील नगर, जळगाव, नाशिक या तीन जिल्ह्यांतील धरणांच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होताना दिसत आहे. मात्र धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा होण्यासाठी मुसळधार पावसाची आवश्यकता आहे. विभागातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून ५६.४५ टीएमसी (२७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी विभागात अवघा सुमारे ८ टक्के पाणीसाठा होता. यंदा मोठ्या २४ प्रकल्पांमध्ये ३७.८७ टीएमसी (२९ टक्के), मध्यम ५३ प्रकल्पांमध्ये १४.७८ टीएमसी (३५ टक्के) आणि लहान ४९४ प्रकल्पांमध्ये ३.८० टीएमसी (१० टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. कोकणात गतवर्षीइतकाच पाणीसाठा  कोकण विभागात यंदा दमदार पावसाने हजेरी लावली. अनेक नद्यांना पूर आल्याने धरणांची पाणीपातळी वेगाने वाढू लागली आहे. विभागात सर्व प्रमुख धरणांमध्ये ५३.४९ टीएमसी (४३ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीही या धरणांमध्ये ४२ टक्के पाणीसाठा होता. कोकणातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये ३४.७८ टीएमसी (४० टक्के), ७ मध्यम प्रकल्पांमध्ये १०.०९ टीएमसी (५९ टक्के) तर १५८ लघू प्रकल्पात ५.०९ टीएमसी (४३ टक्के) पाणीसाठा झाला आहे.  पूर्व विदर्भात यंदा चांगला पाणीसाठा पूर्व विदर्भात यंदा चांगला पाणीसाठा असून, नागपूर विभागातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यातील धरणांमध्ये मिळून ६७.३३ टीएमसी (४१ टक्के) पाणीसाठा आहे. पावसाने जोरदार हजेरी लावल्यास पाणीपातळीत वेगाने वाढ होणार आहे. नागपूर विभागातील १६ मोठ्या प्रकल्पांमध्ये ५६.७२ टीएमसी (४६ टक्के), ४२ मध्यम प्रकल्पांमध्ये ६.२५ टीएमसी (२८ टक्के) तर ३२६ लघू प्रकल्पात ४.३७ टीएमसी (२४ टक्के) पाणी जमा झाले आहे. पश्‍चिम विदर्भात पाणीसाठा २५ टक्क्यांवर पश्‍चिम विदर्भातील अमरावती विभागात ३७.११ टीएमसी (२५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी अमरावती विभागात अवघा ८ टक्के पाणीसाठा होता. यंदा पाणीसाठ्याची स्थिती तुलनेने चांगली आहे. विभागातील १० मोठ्या प्रकल्पांमध्ये ३०.५८ टीएमसी (३५ टक्के), २५ मध्यम प्रकल्पांमध्ये ४.८१ टीएमसी (२० टक्के) तर ४११ लघू प्रकल्पात १.७२ टीएमसी (५ टक्के) पाणीसाठा झाल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.  राज्यातील मोठे, मध्यम, लघू प्रकल्पांमधील ७ जुलैपर्यंतचा उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी) : 

विभाग प्रकल्पांची संख्या एकूण पाणीसाठा शिल्लक साठा टक्केवारी
अमरावती ४४६ १४८.०४ ३७.११ २५
औरंगाबाद ९६४ २६०.३१ ६७.५९ २६
कोकण १७६ १२३.९४ ५३.४९ ४३
नागपूर ३८४ १६२.६५ ६७.३३ ४१
नाशिक ५७१ २१२.०४ ५६.४५ २६
पुणे ७२६ ५३७.०३ १२०.९६ २३
एकूण ३२६७ १४४३.९९ ४०२.९५ २८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com