नांदेड : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी, पूर व परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पहिल्या टप्प्यांत २८२ कोटी ५६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत.
या निधीचे मागणीच्या ५० टक्क्यांनुसार वितरण मंगळवारी (ता. १०) सर्वच सोळा तालुक्यांना करण्यात आले. हा निधी तालुकास्तरावरुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळाली.
जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या पाच महिन्याच्या कालावधीत सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उडीद, मुगासह सोयाबीन, कापूस, ज्वारी या जिराईत पिकांसह बागायती व फळपिकांचे नुकसान झाले. यानंतर ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने पुन्हा तडाखा दिला. यात पाच लाख ६४ हजार ५१८ हेक्टरवरील जिरायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल यंत्रणेने पाठविला होता. शासनाच्या सुधारित दरानुसार जिल्ह्यातील पाच लाख ६४ हजार ५१८ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ५६५ कोटी १३ लाख रुपये निधी लागेल. मंगळवारी (ता.१०) नुकसान झालेल्यांना मदत देण्यासाठी शासनाने २८४ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी दिला.
तालुकानिहाय वितरित निधी
नांदेड- १० कोटी ३३ लाख, अर्धापूर - आठ कोटी ५१ लाख, कंधार - २० कोटी ७६ लाख, लोहा - २६ कोटी ३६ लाख, बिलोली - १६ कोटी २० लाख, नायगाव - १९ कोटी १९ लाख, देगलूर - २२ कोटी ४१ लाख, मुखेड - २४ कोटी ४० लाख, भोकर - १९ कोटी ५७ लाख, मुदखेड - सात कोटी २९ लाख, धर्माबाद - १० कोटी २३ लाख, उमरी - १४ कोटी ३७ लाख, हदगाव - ३२ कोटी ८१ लाख, हिमायतनगर - १५ कोटी ९९ लाख, किनवट - २४ कोटी २३ लाख, माहूर - नऊ कोटी ८३ लाख.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.