सदोष टोमॅटो बियाण्यामुळे साडेतीन कोटींचा फटका 

अनेक वर्षांपासून आम्ही टोमॅटोचे उत्पादन घेतो. असा अनुभव पहिल्यांदाच आलाय. बियाणे खराब असल्यानेच आमचे नुकसान झाले. कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचेही बियाणे खराब असल्याचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. - सुरेश नवले, शेतकरी अकोले, जि. नगर
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

नगर ः टोमॅटो लागवडीसाठी सदोष बियाणे पुरवठा केला. ती बियाणे लागवड केल्याने टोमॅटोचे उत्पादन अत्यंत खराब आले. त्यामुळे व्यापाऱ्यांनाही खरेदीला नकार दिला. त्यामुळे जिल्ह्यातील अकोले व संगमनेर तालुक्यातील सुमारे सव्वा दोनशे शेतकऱ्यांना तीन ते साडेतीन कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा फटका बसला आहे.  सदोष बियाणामुळे नुकसान झाल्याची अकोले (जि. नगर) तालुक्यातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. सबंधीत बियाणे कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या निष्कर्षानंतर कृषी विभागाची तक्रार निवारण समिती यावर निर्णय देणार आहे. आधीच लॉकडाऊनमुळे अडचणीत असताना टोमॅटोचे नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल आहेत.  अकोले, संगमनेर तालुक्यातील बहूतांश गावांत टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. दरवर्षी प्रमाणे यंदाही अनेक शेतकऱ्यांनी टोमटोची लागवड केली. त्यानंतर अगदी उत्पादन हाती येईपर्यंत टोमॅटोचे पीक जोमदार होते. मात्र प्रत्यक्ष फळ हाती आल्यानंतर मात्र फळांत सदोषपणा दिसून आला. फळांचा रंग बदललेला दिसला तर त्यातील कडकपणाही झाडाला असतानाच नाहीसा होतोय. फळांचा आतील भागातील रंगात बदल होत आहे. त्यामुळे बाजारात या टोमॅटोला मागणी नसल्याचा अनेक शेतकऱ्यांना अनुभव आला.  सदोष बियाण्यामुळे पिकाचे नुकसान होत असल्याची अकोले तालुक्यातील १६० तर संगमनेरमधील साठपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यावर टोमॅटोचे नुकसान होत असल्याचे स्पष्ट झाले. आता झालेले नुकसान सबंधित कंपनीकडून मिळावे, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.  शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांना बोलावले. एकदा शास्त्रज्ञांनी भेट देऊन पाहणी केली. आता पुन्हा या किंवा पुढील आठवड्यात शास्त्रज्ञ भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर शास्त्रज्ञांच्या निष्कर्षानुसार उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या अध्यक्षतेखाली असलेली तक्रार निवारण समिती पुढील निर्णय घेणार असल्याचे संगमनेरचे तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी सांगितले.  प्रतिक्रिया काढणीला आलेला टोमॅटोचे नुकसान होत आहे. त्याबाबत शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारी दाखल असून बियाण्यामुळे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या पाहणी अहवालानंतर पुढील बाबीवर निर्णय घेऊ.  - प्रविण गोसावी, तालुका कृषी अधिकारी, अकोले 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com