राज्यातील धरणांमध्ये ४० टक्के पाणीसाठा शिल्लक

धरण
धरण

पुणे : उन्हाळा जवळ येत असतानाच राज्यातील पाणीटंचाईचे सावट आणखी गंभीर होत आहे. दुष्काळाबरोबरच पाणीटंचाईच्या झळा वाढतच असून, राज्यातील धरणांचा पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे. मंगळवारी (ता. २९) राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये ५७०.३९ टीएमसी (४० टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाडा, विदर्भात धरणांच्या पाणीसाठ्याची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये अवघा १३ टक्के पाणीसाठा असून, नागपूर विभागात २१ टक्के, तर अमरावती, नाशिक विभागात धरणसाठा ३७ टक्क्यांवर आला असल्याचे राज्याच्या जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले.  गतवर्षी जानेवारी महिन्याच्या अखेरीस राज्यातील सर्व धरणांमध्ये ५६ टक्के पाणीसाठा होता. तर यंदा तुलनेने पाणीसाठा त्यापेक्षाही १६ टक्क्यांनी खालावला आहे. मराठवाड्यात गतवर्षी ५१ टक्के, तर नागपूर विभागात २७ टक्के, अमरावती विभागात २८ टक्के पााणीसाठा होता. यंदा या विभागातील अनेक धरणे तळाशी पाचली आहेत. राज्यातील १४१ मोठ्या प्रकल्पांमध्ये ४३२.९४ टीएमसी (४२ टक्के), मध्यम २५८ प्रकल्पांमध्ये ७६.०१ टीएमसी (४० टक्के) तर २ हजार ८६८ लहान प्रकल्पांमध्ये ६१.४५ (२७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातून होणारा पाण्याचा उपसा आणि पिण्यासाठी वाढलेली मागणी, वाढते बाष्पीभवन व इतर कारणांमुळे धरणातील पाणी आणखी कमी होणार आहे. मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक धरणे लवकरच कोरडी होणार असून, पुढील काळात ‘पाणीबाणीचा’ सामना करावा लागणार आहे.  मराठवाड्यात अत्यल्प पाणीसाठा सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाडा यंदाही टंचाईच्या कचाट्यात सापडला आहे. मराठवाड्यातील धरणेही कोरडी पडू लागल्याने अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने दुष्काळाची दाहकता आणखी वाढणार आहे. औरंगाबाद विभागातील सर्व ९६४ प्रकल्पामंध्ये मिळून ३३.०८ टीएमसी म्हणजेच अवघे १३ टक्के पाणी आहे. जायकवाडी धरणात १३.०८ टीएमसी (१७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा असून, अचल पाणीसाठा विचारात घेता धरणात एकूण ३९.४१ टीएमसी (३८ टक्के) पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील मांजरा, माजलगाव (बीड) येलदरी (हिंगोली), सिना कोळेगाव (उस्मानाबाद) ही धरणे रिकामी झाली आहेत. निम्नतेरणा, निम्न दुधना धरणांनी तळ गाठला आहे. विभागातील मोठ्या ४५ प्रकल्पांमध्ये २०.०७ टीएमसी (१३ टक्के), मध्यम ८१ प्रकल्पांमध्ये ५.०९ टीएमसी (१४ टक्के), तर लहान ८३८ प्रकल्पांमध्ये ७.९३ टीएमसी (१२ टक्के) पाणी शिल्लक राहिले आहे. पुणे विभागात पाणीसाठा ५५ टक्क्यांवर राज्यातील सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असलेल्या पुणे विभागातही यंदा गतवर्षीपेक्षा जवळपास १५ टक्क्यांनी कमी पाणीसाठा आहे. विभागातील एकूण ७२६ धरणांमध्ये यंदा जवळपास २९२.८६ टीएमसी (५५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच तारखेला ८३ टक्के पाणीसाठा असलेल्या उजनी धरणात यंदा १३.७० टीएमसी (२६ टक्के) चल पाणीसाठा आहे. धरणाचा अचल पाणीसाठा विचारात घेता एकूण ७७.३८ टीएमसी (६६ टक्के) पाणीसाठा आहे. तर कोयना धरणामध्येही चल व अचल मिळून ८१.७८ टीएमसी (७८ टक्के) पाणी शिल्लक आहे. विभागातील इतर धरणांचा पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. विभागातील ३५ मोठ्या प्रकल्पांमध्ये २७४.६४ टीएमसी (५८ टक्के), मध्यम ५० प्रकल्पांमध्ये २४.६४ टीएमसी (५१ टक्के) आणि लहान ६४१ प्रकल्पांमध्ये १४.७७ टीएमसी (३० टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. नाशिक विभागात ७७ टीएमसी पाणीसाठा  अखेरच्या टप्प्यात पावसाने ओढ दिल्याने नाशिक विभागातील लहान, मध्यम, मोठ्या अशा एकूण ५७१ प्रकल्पांमध्ये ७७.६१ टीएमसी (३७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. विभागात यंदा गतवर्षीपेक्षा तलनेत जवळपास २५ टक्के कमी पाणी शिल्लक आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात नाशिक, नगरसह मराठवाड्यातील जिल्ह्यांना यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. नाशिक विभागातील मोठ्या २४ प्रकल्पांमध्ये ५१.६६ टीएमसी (३९ टक्के), मध्यम ५३ प्रकल्पांमध्ये १७.४३ टीएमसी (४१ टक्के) आणि लहान ४९४ प्रकल्पांमध्ये ८.६२ टीएमसी  (२३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. कोकणात पाणीसाठा होतोय कमी  कोकण विभागातील धरणांचा पाणीसाठा कमी होत असून, यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणी शिल्लक आहे. कोकण विभागात सध्या ६३ टक्के पाणी शिल्लक असून, गतवर्षी याच तारखेला ७१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होते. कोकणात सर्व १७६ धरणांमध्ये मिळून यंदा ७७.७९ टीएमसी पाणी आहे. कोकणातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये ५२.९९ टीएमसी (६१ टक्के), ७ मध्यम प्रकल्पांमध्ये १३.२९ टीएमसी (७७ टक्के) तर १५८ लघू प्रकल्पात ११.५१ टीएमसी (५८ टक्के) पाणीसाठा आहे. यात पालघर जिल्ह्यातील धमणी ७३ टक्के, कवडास ७९ टक्के, ठाणे जिल्ह्यातील उर्ध्व घाटघर धरणात ८२ टक्के, भातसा ६२ टक्के तर निम्म चौंडे धरणात ३१ टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिल्लारी धरणांत ६२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.  विदर्भात पाणीसाठा होतोय गंभीर विदर्भात सलग दुसऱ्या वर्षी धरणांची पाणीपातळी खालावली असल्याने पाणी स्थिती चिंताजनक होत आहे. पूर्व विदर्भातील नागपूर विभागात यंदा ३४.४० टीएमसी (२१ टक्के), तर अमरावती विभागात ५४.६५ टीएमसी (३७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी अमरावती विभागात अवघे २८ टक्के तर नागपूर विभागात २७ टक्के पाणी होते. यंदा नागपूर विभागातील धरणांची स्थिती अधिक गंभीर झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपुर्णा आणि पेनटाकळी धरणे तळाशी गेली असून, अमरावतीच्या उर्ध्व वर्धा धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसी खुर्द आणि बावनथडी, गाेंदियातील सिरपूर, नागपूरमधील खिंडसी, तोतलाडोह, वर्धातील निम्नवर्धा आणि बोर या धरणांमध्ये खूपच कमी पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. राज्यातील मोठे, मध्यम, लघू पाटबंधारे प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)

विभाग प्रकल्पांची संख्या एकूण पाणीसाठा शिल्लक साठा टक्केवारी
अमरावती ४४६ १४८.०४ ५४.६५ ३७
औरंगाबाद ९६४ २६०.२७ ३३.०८ १३
कोकण १७६ १२३.९२ ७७.७९ ६३
नागपूर ३८४ १६२.६५ ३४.४० २१
नाशिक ५७१ २११.९७ ७७.६१ ३७
पुणे ७२६ ५३७.०१ २९२.८६ ५५
एकूण ३२६७ १४४३.८८ ५७०.३९ ४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com