येवला : महिन्यापूर्वी २५ ते ३० रुपयांना मेथीची जुडी विक्री होत होती. त्यामुळे तालुक्यातील मोठ्या क्षेत्रावर मेथीचे पीक तरारलेले. मात्र, सध्या मेथीला भाव नसल्याने व्यापारीवर्ग मेथीची भाजी खरेदीला टाळाटाळ करत आहेत. अनेक शेतकऱ्यांना या मेथीचे करावे काय? असा प्रश्न पडला आहे. असाच विदारक अनुभव विखरणीचे शेतकरी जनार्दन शेलार यांनी घेतला. त्यांना मेथी पिकवायला ४४०० रुपये खर्च आला आणि भाजी विकून त्यांच्या हातात केवळ २९५० रुपये पडले. त्यांच्यावर १४५० रुपयांचा तोटा सहन करण्याची वेळ आली.
एकीकडे कांद्याची निर्यातबंदी असल्याने त्याच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत आहे. अतिपावसाने कांद्याची ७० टक्के रोपे खराब झाली. उर्वरित ३० टक्के कांदा रोपांची लागवड झाली. तरीही प्रतिकूल हवामानामुळे रोपेही खराब झाली आहेत. त्यामुळे कांदा लागवडीसाठी ठेवलेली जमीन तशीच पडून आहे. त्यामुळे शेतकरी भाजीपाल्याकडे वळला. मात्र, त्यातही घाटा होत आहे. गाडीभाडेही सुटत नसल्याने शेतकरी भाजी मार्केटमध्येच फेकून देत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी मेथीच्या शेतात चरण्यासाठी जनावरे सोडली आहेत.
शेलार यांनी आपल्या शेतात १० गुंठे भाजी केली होती. भाजी लागवडीपासून विक्रीपर्यंत त्यांना ४४०० रुपये खर्च आला. विक्रीतून केवळ २९५० रुपये मिळाले. एक ते दीड महिना कुटुंबातील सदस्यांसह काबाडकष्ट करून मोठ्या कष्टाने भाजी पिकवली. आता नफा होण्याऐवजी त्यांना चक्क १४५० रुपयांचा तोटा सहन करावा लागला. शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय झाल्याची उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी व्यक केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.