पीकविम्यापासून ४५ हजार शेतकरी वंचित

पीकविम्यापासून ४५ हजार शेतकरी वंचित
पीकविम्यापासून ४५ हजार शेतकरी वंचित

जळगाव : जिल्ह्यात मागील हंगामात राबविलेल्या खरीप पीकविमा योजनेपासून सुमारे ४५ हजार शेतकरी वंचित असून, महसुली अधिकाऱ्यांच्या चुकीच्या पद्धतीने राबविलेल्या उंबरठा उत्पादन पद्धतीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.  

पाचोरा तालुका यातून वगळण्यात आल्याने कोणालाच पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. असाच प्रकार जळगाव, यावलमधील शेतकऱ्यांबाबत झाला आहे. जे शेतकरी कर्जदार होते, त्यांना हा विमा सक्तीचा होता. त्याची रक्कम संबंधित बॅंकेने परस्पर कापून घेतली. सुमारे एक लाख शेतकऱ्यांनी या योजनेत मागील हंगामात सहभाग घेतला. पण राष्ट्रीयीकृत व जिल्हा बॅंकेच्या मिळून फक्त ३५ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असल्याची माहिती मिळाली.

योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांबाबत काही बॅंकांनी मंडळ व पिकनिहाय घोषणापत्र सादर केले नाही. विमा पोर्टलसंबंधी माहिती भरलीच नाही. याशिवाय प्रशासनाने उंबरठा उत्पादनाची माहिती वास्तवाला धरून दिली नाही. मागील पाच वर्षांची उत्पादन, उत्पादकता याची सविस्तर माहिती सादर करायची होती. ती व्यवस्थित संकलित केली नाही. टेबलवर बसून काम केले, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

प्रशासनाच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे पीकविमा मंजुरीच्या यादीतून वगळला गेला आहे. बॅंकेने पीकविमा भरला असून, त्यात कुठल्याही शेतकऱ्याचे नाव आले नसल्याचे बॅंकेतर्फे सांगण्यात येते. सरसकट शेतकऱ्यांना परत पाठविले जाते, असे रावेर येथी शेतकरी रामेश पाटील (रावेर) यांनी सांगितले.

डाळिंब पीकविम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा धुळे ः डाळिंबाच्या हवामान आधारित पीकविमा भरपाईपासून वंचित असलेल्या नेर (ता. धुळे) व परिसरातील ६२ पैकी ५९ शेतकऱ्यांना २० लाखांची भरपाई नाशिकच्या विभागीय सेंट्रल बॅंकेने शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

नेर मंडळातील ६२ शेतकऱ्यांपैकी ५९ शेतकऱ्यांना भरपाई मिळाली. मात्र उर्वरित तीन शेतकऱ्यांना तांत्रिक माहितीअभावी भरपाई मिळाली नाही. त्यात सातबारा नसणे, अर्ज नाही, एका शेतकऱ्याच्या खात्यावर व्यवहार नाही, असे कारण सांगितले जाते. पीकविम्याची परस्पर खात्यावर जमा झालेली रक्कम बॅंकेने कर्जात वर्ग न करता शेतकऱ्यांना दिली आहे, असे बॅंकेच्या सूत्रांनी सांगितले.

"वंचित तीन शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळावा, यासाठी योग्य माहिती घेऊन तांत्रिक दोष बाजूला करण्यात येतील. भरपाईसाठी त्या शेतकऱ्यांचा प्रस्ताव सादर करू, तशी प्रक्रिया सुरू आहे,`` असे नेर येथील सेंट्रल बॅंकचे  शाखा व्यवस्थापक एस. डी. निंकुभे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com