परभणी ः ‘‘जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात ५ लाख २७ हजार २२० हेक्टरवर पेरणी नियोजित आहे. यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊन २ लाख ४० हजार हेक्टरवर पेरणी आणि कपाशीच्या क्षेत्रात घट होऊन २ लाख हेक्टरवर लागवड होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना विविध पिकांच्या पेरणीसाठी ७१ हजार ८४० क्विंटल बियाण्याची मागणी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे करण्यात आली आहे’’, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी दिली.
जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र लाख २३ हजार ३६२ हेक्टर आहे. यंदा ५ लाख २ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. कडधान्य पिकांमध्ये तुरीच्या क्षेत्रात वाढ, तर मूग, उडदाच्या क्षेत्रात घटीची शक्यता आहे. तृणधान्य पिकांमध्ये ज्वारी, बाजरी च्या क्षेत्रातील घट यंदाही कायम राहील, असा अंदाज आहे.
सोयाबीन क्षेत्रानुसार एकूण १ लाख ८० हजार क्विंटल बियाण्याची गरज आहे. ग्रामबिजोत्पादन मोहिमेव्दारे तसेच शेतकऱ्यांनी स्वतः राखून ठेवलेले बियाणे स्थानिक पातळीवर एकूण १ लाख २३ हजार ६०० क्विंटल बियाणे उपलब्ध होऊ शकेल. उर्वरित बियाण्याची गरज भागविण्यासाठी ६० हजार ६०० क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाबीजकडे ३० हजार क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडे ५ हजार क्विंटल, खासगी कंपन्यांकडे २५ हजार ६०० क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली. अन्य पिकांमध्ये तुरीचे २ हजार ४०१ क्विंटल, मुगाचे २ हजार ५२० क्विंटल, उडदाचे ८४० क्विंटल, ज्वारीचे ३०४ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.