पाचसुत्री धोरणातून शेतकऱ्यांना सक्षम करा 

कोरोनामुळे सुुरु असलेल्यालॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना पाचसुत्री धोरणांचा अवलंब करावा, असा सल्ला प्रख्यात कृषी शास्रज्ञ एम.एस. स्वामिनाथन यांनी दिला.
ms_swaminathan
ms_swaminathan

नवी दिल्ली: कोरोनामुळे सुुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना पीक सल्ला, शेतमाल साठवणुकीची सुविधा, बियाणे उपलब्धता, महिला शेतकऱ्यांचे सबलीकरण आणि शेतमाल प्रक्रिया यंत्रांची उपलब्धता या पाचसुत्री धोरणांचा अवलंब करावा, असा सल्ला प्रख्यात कृषी शास्रज्ञ एम.एस. स्वामिनाथन यांनी दिला.  केंद्र सरकारने जाहिर केलेल्या लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना सर्वाधिक आर्थिक फटका बसत आहे. या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रख्यात कृषी शास्रज्ञ एम.एस. स्वामिनाथन यांनी केंद्र आणि राज्य सरकारांना पाचसुत्री धोरण सुचविले आहे. एम.एस.स्वामिनाथन फाऊंडेशनच्या वतीने प्रसिध्द करण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही उपाय सुचविले आहेत.  ‘‘किड-रोगांवर घ्यावी लागणारी काळजी, जमिनिचे आणि झाडांचे आरोग्य चांगले राहवे यासाठी शेतकऱ्यांना पुरक कृषी सल्ला देण्यात यावा. हे मानवी आरोग्यासाठीही चांगले आहे. तसेच या काळात शेतकऱ्यांना शीतगृह अथवा इतर साठवणुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून बाजार सुरु होईपर्यंत शेतकऱ्यांना आपला माल साठविता येईल,’’ असे त्यांनी म्हटले आहे.  ‘‘दुधाच्या बाबतीत राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने (एनडीडीबी) या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच राष्ट्रीय फलोत्पादन विकास बोर्डाने याबाबत पुढाकार घेऊन काम करावे. येणाऱ्या खरिप हंगामात अल्प भूधारक शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीच्या बियाण्यांची उपलब्धता व्हावी तसेच जमिन आणि पाण्याचा पुरपूर वापर करण्यासाठी त्रिमितीय पीक पध्दतीसारख्या तंत्राचा अवलंब करावा,’’ असे स्वामिनाथन यांनी सुचविले आहे.  देशातील शेती आणि संलग्न क्षेत्रात महिलांचे योगदान मोठे आहे. श्‍वेत क्रांती हे याचे उत्तम उदाहरण आहे, असा दाखल देत ते म्हणाले, ‘‘महिला शेतकरी फलोत्पादनातही पुढे आहेत. या महिलांना समोर ठेवून या संकटाच्या कमी हॉर्सपॉवरच्या ट्रॅक्टरसहित तांत्रिक आणि पतपुरवठ्यासारख्या आर्थिक सबलीकरणाचे काम करावे. तसेच शेतमालाची विक्री साखळीत मुल्यवर्धनासाठी तेल काढणीसाठी लागणारी यंत्रे किंवा फळांपासून ज्युस तयार करण्यासाठी लागणारी यंत्रे, अशा आवश्‍यक यंत्रांची उपलब्धता असावी.’’  लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना अशी मदत केल्यास लहान क्षेत्रधारक शेतकरी फलोत्पादन क्रांती घडून येईल, असे एम. एस. स्वामिनाथन यांनी नमुद केले.  एम. एस स्वामिनाथन म्हणतात... 

  • शेतकऱ्यांना पुरक कृषी सल्ला देण्यात यावा 
  • शीतगृहे, इतर साठवणुकीची सुविधा उपलब्ध करा 
  • चांगल्या प्रतीच्या बियाण्यांची उपलब्धता व्हावी 
  • महिला शेतकऱ्यांचे तांत्रिक आणि आर्थिक सबलीकरण करावे 
  • शेतमाल मुल्यवर्धनासाठी आवश्‍यक यंत्रे उपलब्ध व्हावीत   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com