यवतमाळ : जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू आहे. याचा फायदा घेत आता मोठ्या प्रमाणात परवानगी नसलेली बोगस बियाणे येत आहेत. अमरावती जिल्ह्यातून कळंब येथे जात असलेल्या बीटी बियाण्याची पाकिटे कृषी विभागाने जप्त केले. ही कारवाई यवतमाळ-कळंब मार्गावर केली. दुष्काळी परिस्थितीनंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत. दमदार पाऊस झाल्यानंतर दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची जवळपास सर्व तयारी केली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, म्हणून तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात यंदा साडेनऊ लाख हेक्टरवर पेरणी होणार आहे. त्यात सर्वाधिक ४ लाख ५८ हजार हेक्टरवर कापसाची लागवड केली जाणार आहे. २ लाख ७७ हजार हेक्टरवर सोयाबीन, तर १ लाख ५० हजार हेक्टरवर तुरीची लागवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बी-बियाणे, खतांचा साठा करणे, कृषी विभागाने सुरू केलेले आहे. शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बियाणे कृषी सेवा केंद्रापर्यंत पोहोचले आहे. असे असले तरी परवानगी नसलेले बियाणेही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहे. अमरावती वरून ‘बीटी’ची मोठी खेप येत होती. कृषी विभागाने हा साठा जप्त केला. या संदर्भात यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई जिल्हा कृषी अधिकारी नीलेश ढाकुलकर, राजेंद्र माळोदे, पंकज बरडे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी दतात्रय आवारे आदी उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.