नगर ः नगर जिल्ह्यात दोन दिवस (ता. २० व २१) झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे साडेसहा हजार हेक्टरला फटका बसला असून, जिल्हाभरातील सहा तालुक्यांत दहा हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. दरम्यान, सोमवारीही (ता. २२) काही भागांत पाऊस झाला.
नगर जिल्ह्यात सहा दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे. शनिवार व रविवार असे दोन दिवस जोरदार पावसासह गारपीट झाली. अचानक झालेल्या पावसाने काढणीला आलेल्या रब्बीतील पिकांसह उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून, दोन दिवसांत जिल्हाभरातील ६० पेक्षा अधिक गावांच्या शिवारात साडेसहा हजार हेक्टरवर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
राहुरी तालुक्यात सर्वाधिक पावसाचा व गारपिटीचा फटका बसला असून, चार गावांत सहा हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. पाथर्डी तालुक्यात २४ गावांत, तर शेवगावात १६ गावांत गारपिटीने नुकसान झाले. कोपरगाव तालुक्यात एक हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोमवारी काही भागांत पाऊस झाला आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तालुकानिहाय अंदाज नुकसान (हेक्टर) शेवगाव ः ८५४, संगमनेर ः ३५८, पाथर्डी ः ३०४, राहुरी ः ३७३०, नेवासा ः ५६६, कोपरगाव ः ४९४ या पिकांचे झालेय नुकसान गहू, हरभरा, कांदा, मका, उन्हाळी भुईमूग, उन्हाळी बाजरी, चारा पिके, भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब, द्राक्ष, कागदी लिंबू, कलिंगड, मोसंबी, पेरू, चिकू, पपई, टोमॅटो, संत्रा, आंबा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.