राज्यातील सातशे गावांमध्ये बोंड अळीचा धुडगूस : कृषी विभाग

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : कपाशीतील बोंड अळीचे संकट आता ७०० गावांपर्यंत पसरले आहे. बोंड अळीच्या नियंत्रणासाठी स्वतः कृषी आयुक्त रोज आढावा घेत आहे. अनेक गावांमध्ये अजूनही शेतकऱ्यांना अनावश्यकपणे संजीवकांचा वापर करण्यास भाग पाडले जात असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

राज्यात खरीप पिकाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. आतापर्यंत ३९ लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा झाला आहे. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पावसातील खंडामुळे आणि जामदार कायिक वाढीमुळे कापूस पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे यांसारख्या रस शोषणाऱ्या किडींचा प्रार्दुभाव दिसुन येत आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले. बोंड अळीचे संकट वाढत आहे. राज्यातील २१ हजार गावांमध्ये ४२ लाख हेक्टरवर कापूस घेतला जातो. यंदा आतापर्यंत ७०० गावांमध्ये बोंड अळीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.  

बोंड अळीने आर्थिक नुकसानीची पातळी (ईटीएल) ओलांडल्यानंतर अशा जिल्ह्यांमध्ये आता जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या परिस्थितीला हाताळण्यासाठी एकटा कृषी विभाग आहे. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बोंड अळी नियंत्रण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र, या समित्यांचे प्रभावी काम अनेक भागात सुरू झाल्याचे दिसत नसल्याचे एका कृषी अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, बोंड अळीचे संकट वाढलेले असताना काही भागात कपाशी तसेच इतर पिकांवर संजीवकांच्या वापरामुळे किडी वाढल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मुळात कोणत्याही प्रकारची संजिवके, हार्मोन्स, टॉनिकची शिफारस पिकांसाठी नाही. शेतकऱ्यांची दिशाभूल करून संजीवके विकली जात असल्याने उलटा परिणाम पिकावर होतो आहे. टॉनिकचा वापर केल्याने पिकाची केवळ कायिक वाढ होते. त्यामुळे फक्त पिकाचा लुसलुशीतपणा वाढतो, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

राज्यात सध्या ९०० पेक्षा जास्त गावांमध्ये पिकांवर मावा, तुडतुडे, फुलकिडे यांसारख्या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसतो. किडी वाढण्यास कारणीभूत असलेल्या कारणांपैकी या पिकांची संजीवकांमुळे होत असलेली कायिक वाढ व लुसलुशीतपणा हे देखील आहे. शेतकऱ्यांना या किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीवरील खर्च वाढतो, असा दावा कृषी विभागाने केलेला आहे.

संप्रेरकांच्या परिणामाचे ठोस निष्कर्ष नाहीत आकर्षक प्रचार, सुबक पॅकिंग, कंपनी व विक्रेत्यांच्या दिशाभूल करणाऱ्या दाव्यामुळे संप्रेरके, संजीवके, हार्मोन्सचा वापर करण्यास शेतकऱ्यांना भाग पाडले जाते. अशा वाढ संप्रेरकाच्या प्रत्यक्ष पीक उत्पादनवाढीसाठी नेमका किती परिणाम होतो. याबाबत ठोस निष्कर्ष नाहीत. कृषी विद्यापीठे व संशोधन केंद्रांनी देखील तशा शिफारशी केलेल्या नाहीत, असा दावा कृषी आयुक्तालयाने केला आहे.

राज्यात विकल्या जात असलेल्या या औषधांना व रसायनांना केंद्र तसेच राज्य शासनाने कुठेही मान्यता दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी टॉनिक अजिबात वापरू नये, असे कृषी अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com