राज्यातील धरणांमध्ये ७३ टक्के पाणीसाठा

राज्यातील धरणांमध्ये ७३ टक्के पाणीसाठा
राज्यातील धरणांमध्ये ७३ टक्के पाणीसाठाAgrowon

पुणे : मॉन्सूनच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे सातत्याने ओसंडून वाहत आहेत; तर उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधूनही पाणी सोडावे लागत आहे. कोयना, उजनी आणि जायकवाडी ही तीनही  धरणे भरली. पूर्व विदर्भातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला असला, तरी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये मात्र अद्यापही पुरेशा पाणीसाठ्याअभावी स्थिती चिंताजनक आहे. सोमवारी (ता. ३०) राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये १ हजार ५८ टीएमसी (७३ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच तारखेला सर्व प्रकल्पांमध्ये सुमारे ६५ टक्के पाणी उपलब्ध होते.

विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार करता यंदा मराठवाड्यात सर्वांत कमी ४० टक्के, तर पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात सर्वांत कमी ५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. पूर्व विदर्भातील नागपूर विभागात पाणीसाठ्याची स्थिती चांगलीच सुधारली असून, तब्बल ८३ टक्के पाणीसाठा झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागात ८७ टक्के, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागात ७८ टक्के आणि कोकण विभागात ९० टक्के पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालावरून दिसून येते.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील धरणांचा पाणीसाठा ८ टक्क्यांनी अधिक आहे. गतवर्षी अमरावती विभागात ५८ टक्के, औरंगाबाद विभागात २७ टक्के, नागपूर ५१ टक्के, पुणे ८४ टक्के, नाशिक ६३ टक्के आणि कोकण विभागात ९० टक्के पाणीसाठा होता.

पश्चिम महाराष्ट्रातील धरणांतून विसर्ग सुरूच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील धरणांच्या पाणलोटात दमदार पाऊस झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील धरणे शंभर टक्के भरलेली असून, त्यातून कमी- अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विभागातील प्रमुख धरणांमध्ये मिळून ४६८.७० टीएमसी (८७ टक्के) पाणीसाठा आहे. उजनी, कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने दोन्ही धरणांतून मोठा विसर्ग करावा लागत आहे. विभागातील ३५ मोठ्या प्रकल्पांमध्ये ४३० टीएमसी (९८ टक्के), मध्यम ५० प्रकल्पांमध्ये २६.९९ टीएमसी (५६ टक्के) आणि लहान ६४१ प्रकल्पांमध्ये ११.७० टीएमसी (२३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.

उत्तर महाराष्ट्रातील लघू, मध्यम प्रकल्प रिकामेच उत्तर महाराष्ट्रातील नगर, जळगाव, नाशिक या तीन जिल्ह्यांतील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. नाशिकमधील धरणांतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरण पूर्णपणे भरून पाण्याचा विसर्ग करावा लागला. नगर, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील धरणे भरली आहेत. मोठी धरणे भरली असली तरी मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये मात्र पुरेसा पाणीसाठा झालेला नसल्याने रिकामेच आहेत. नाशिक विभागातील सर्व ५७१ प्रकल्पांमध्ये मिळून १६४.४८ टीएमसी (७८ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. नाशिक विभागातील मोठ्या २४ प्रकल्पांमध्ये १२७.३३ टीएमसी (९६ टक्के), मध्यम ५३ प्रकल्पांमध्ये २२.९३ टीएमसी (५४ टक्के) आणि लहान ४९४ प्रकल्पांमध्ये १४.२२ टीएमसी (३८ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.

कोकणातील धरणांत ९० टक्के पाणीसाठा सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह कोकणात झालेल्या दमदार पावसामुळे पश्चिमवाहिनी नद्यांना पूर आले. कोकण विभागातील सर्वच धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला आहे. कोकण विभागात सर्व प्रमुख धरणांमध्ये १११.७७ टीएमसी (९० टक्के) पाणीसाठा झाला आहे. कोकणातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये ८५.४८ टीएमसी (९८ टक्के), ७ मध्यम प्रकल्पांमध्ये १३.७८ टीएमसी (८० टक्के), तर १५८ लघू प्रकल्पांत १२.५० टीएमसी (६३ टक्के) पाणीसाठा झाला आहे.

पूर्व विदर्भात चांगला पाणीसाठा ऑगस्ट अखेरपर्यंत जोरदार पावसाअभावी चिंताजनक पातळीत असलेली पूर्व विदर्भातील पाणीसाठ्याची स्थिती आता चांगली सुधारली आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांतील धरणांमध्ये सध्या १३३.०७ टीएमसी (८२ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गोसी खुर्द, इटियाडोह, तोतलाडोह, कामठी खैरीसह अनेक धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला. नागपूर विभागातील १६ मोठ्या प्रकल्पांमध्ये १०२.५० टीएमसी (८५ टक्के), ४२ मध्यम प्रकल्पांमध्ये १७.७३ टीएमसी (७९ टक्के), तर ३२६ लघू प्रकल्पात १२.८५ टीएमसी (७२ टक्के) पाणीसाठा आहे.

पश्चिम विदर्भात निम्मा पाणीसाठा पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात ७४.७६ टीएमसी (५१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीही अमरावती विभागात सप्टेंबरअखेरीस ५८ टक्के पाणीसाठा होता. अमरावतीतील उर्ध्ववर्धा, बुलडाण्यातील पेनटाकळी आणि यवतमाळमधील बेंबळा धरण शंभर टक्के भरले आहे. यवतमाळमधील उर्वरित धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. विभागातील १० मोठ्या प्रकल्पांमध्ये ५०.५७ टीएमसी (५८ टक्के), २५ मध्यम प्रकल्पांमध्ये १४.४२ टीएमसी (६० टक्के), तर ४११ लघू प्रकल्पांत ९.७८ टीएमसी (२७ टक्के) पाणी असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील मोठे, मध्यम, लघू पाटबंधारे प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)

जायकवाडी भरूनही मराठवाड्यात अवघा ४० टक्के पाणीसाठा राज्यातील दुष्काळाचे केंद्र ठरलेल्या मराठवाड्याला पावसाअभावी सातत्याने तीव्र पाणीटंचाई सोसावी लागत आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसाने गोदावरीला महापूर आल्याने जायकवाडी धरण भरले. जायकवाडी धरणाच्या अचल साठ्यात २६.०५ टीएमसी, तर चल साठ्यामध्ये ७६.६४ टीएमसी (१०० टक्के) असे एकूण १०२.७३ टीएमसी (१०० टक्के) पाणी आहे. हिंगोलीच्या येलदरी धरणात ६ टक्के, तर नांदेडच्या निम्न मनार धरणात १०० टक्के पाणीसाठा असला, तरी मराठवाड्यातील उर्वरित धरणांच्या पाणलोटात पावसाने ओढ दिल्याने बीड, हिंगोली, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यातील धरणे रिकामीच आहेत. विभागातील मोठ्या ४५ प्रकल्पांमध्ये ८९.१२ टीएमसी म्हणजेच ५६ टक्के, मध्यम ८१ प्रकल्पांमध्ये ७.६३ टीएमसी (२० टक्के), तर लहान ८३८ प्रकल्पांमध्ये ८.४६ टीएमसी (१३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com