डाळिंबाच्या ८० हजार हेक्टर बागांना फटका

यंदा अतिपाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे तेलकट डाग, कुजवा आणि पिन होल बोअरर (खोड कीड) याचा मोठा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.
80,000 hectares of pomegranate orchards hit
80,000 hectares of pomegranate orchards hit

सांगली ः देशातील डाळिंब उत्पादक सलग तिसऱ्या वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. तर यंदा अतिपाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे तेलकट डाग, कुजवा आणि पिन होल बोअरर (खोड कीड) याचा मोठा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. परिणामी डाळिंबाचे ७२ हजार ते ८० हजार हेक्टरवरील नुकसान झाले असल्याचा अंदाज डाळिंब संघाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

देशात २ लाख हेक्टर इतके डाळिंबाचे क्षेत्र आहे. प्रामुख्याने डाळिंबाचा मृग बहर मोठ्या प्रमाणात घेतला जातो. देशात यंदाच्या हंगामात सुमारे ४० ते ६० टक्के म्हणजे ८० ते ९० हजार हेक्टरवर पीक घेतले आहे. मृग बहरातील डाळिंबाची युरोपसह बांगलादेशात मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. या हंगामातील डाळिंबाला अपेक्षित दरही मिळतो. त्यामुळे या हंगामात डाळिंबाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी नियोजन करतात. 

गेल्या दोन वर्षांपासून डाळिंब उत्पादक शेतकरी नैसर्गिक आपत्तीच्या संकटाशी दोन हात करून बागा फुलवत आहेत. गेल्या वर्षी डाळिंबाचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात डाळिंबास उच्चांकी दर मिळाला होता. परंतु उत्पादन घटल्याने घातलेला खर्चदेखील निघाला नव्हता. त्यातच अतिवृष्टीमुळे मगृ बहरातील डाळिंबाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा आंबिया बहर धरला होता. त्यातून झालेले नुकसान भरून काढता येईल, अशी आशा होती. परंतु पिन बोअरर होलचा प्रादुर्भाव झाला. पावसाने तेलकट रोग आला. अशी संकटांची मालिका शेतकऱ्यांसमोर आली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात ओढावला आहे.

मगृ बहर शेतकऱ्यांनी धरला आहे. वास्तविक पाहता, या हंगामात डाळिंबाचे चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. सुरुवातीच्या काळात डाळिंबास पोषक असे वातावरण होते. त्यामुळे काही भागांत डाळिंब फुलकळींचे सेटिंगदेखील चांगले झाले. परंतु गेल्या काही दिवसांपासून पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे कळी सेंटिग बिघडले आहे. त्यातच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पावसाची रिमझिम यामुळे तेलकट रोगाचा प्रादुर्भावदेखील होण्यास सुरुवात झाली आहे. अतिपावसाने शेतात पाणी साचल्याने डाळिंबाला कुजवा होऊ लागला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात डाळिंबाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मुळात ज्या भागात पाऊस कमी आहे, त्या भागात डाळिंब पीक चांगले आहे. परंतु यंदा या हंगामात ५ ते १० टक्के पीक शेतकऱ्यांच्या हाती लागेल, अशी परिस्थिती या नैसर्गिक आपत्ती आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाली आहे.

राजस्थान, गुजरातमध्ये पीक बरे गेल्या काही वर्षांत राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यांत डाळिंबाचे क्षेत्र वाढले आहे. या भागात कमी पाऊस झाल्याने या दोन्हीही राज्यांत डाळिंबाचे पीक बरे आहे. या दोन्ही राज्यांत ३० हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र असून, यंदा २० हजार हेक्टरवरील मगृ बहर आहे. या दोन्ही राज्यांत दरवर्षी फूल सेटिंग चांगले असल्याने पीक चांगले येईल, असा अंदाज संघाने व्यक्त केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com