सांगली : जत तालुक्यात या वर्षी दमदार पाऊस पडला. मागील पाच वर्षांतील उच्चांकी पावसाची नोंद झाल्याने तालुक्यातील पाटबंधारे विभागाचे मध्यम व लघुप्रकल्प आणि कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यामुळे रब्बी हंगामातील पिके, द्राक्ष, डाळिंब पिकांना याला लाभ होणार आहे. या वर्षी पाणी टंचाई भासण्याची चिन्हे नाहीत. दर वर्षी पाण्यासाठी वणवण करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जत तालुका बारमाही दुष्काळी भाग आहे. दर वर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाद्वारे टॅंकरने पाणी पुरवठा केला जातो. शेतीसाठी शेतकरी टॅंकरने पाणी देऊन द्राक्ष आणि डाळिंब पीक वाचवण्यासाठी धडपडत असतो. गेल्या पाच वर्षांत तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे भूजल पातळी मोठी घट झाली होती. पाणी नसल्याने रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी वाळू जात होती. पाऊस कमी असल्याने जिरायती व कोरडवाहू जमिनीचे क्षेत्र अधिक आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. तालुक्यात ७७८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. मुचंडी, शेगाव, संख, जत, कुंभारी, तिकोंडी या मंडल विभागात अतिवृष्टी झाली. तर उमदी, माडग्याळ मंडळात कमी पाऊस झाला. तालुक्यात पाटंबधारे विभागाचे २७ तलाव असून सध्या या तलावांत ७६ टक्के इतका पाणीसाठा आहे. अद्याप टॅंकरची मागणी नाही दर वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून टॅंकरची मागणी सुरू होते. डिसेंबरपासून सुरू झालेले टॅंकर जून-जुलैपर्यंत सुरूच असतात. परंतु यंदा तालुक्यात पुरेसे पाणी असल्याने टॅंकरची मागणी अद्याप झाली नसल्याचे चित्र आहे. या वर्षी पाणीपातळी वाढल्याने टॅंकरची गरज भासणार नाही किंवा मे महिन्यात अत्यंत कमी टॅँकर सुरू करावे लागतील, असे चित्र आहे. परिणामी प्रशासनाचा टॅंकरवर होणारा खर्च देखील वाचणार आहे.
दृष्टिक्षेपात जत तालुका
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.