सोलापूर : ‘‘निवडणुकी आधी मला ईडीची नोटीस पाठवली, ज्या बॅंकेशी माझा काहीही संबंध नव्हता, त्यात मला ओढले. काल अजित पवारांकडेही सरकारी पाहुणे आले. सरकारी पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडले जाते, ईडीच्या नावाखाली त्रास दिला जातो, ज्यांच्या हाती सत्ता आहे. त्यांच्याकडून होणारा सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे,’’ अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. ८) भाजपला फटकारले. पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सोलापुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी कॉंग्रेसच्या माजी महापौर नलिनी चंदेले, सुधीर खरटमल या नेत्यांसह शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पवार म्हणाले, ‘‘जवाहरलाल नेहरुंच्या काळात पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर देण्यात आला. पण आज मोदी सरकार मात्र त्याच्या विरुद्ध काम करताना दिसत आहेत. रेल्वे, बंदर, विमानतळांचे खासगीकरण करत सुटले आहेत. दळणवळणाच्या सुविधांतही खासगीकरण वाढते आहे. व्यापाऱ्यांच्या हातात सूत्रे दिली जात आहेत. दुसरीकडे महागाई वाढत आहे. त्याचा सर्वसामान्यांसह सर्वच घटकावर परिणाम होत आहे. या सरकारला विरोध करण्याची भूमिका घ्यावी लागेल. त्यासाठी भाजपविरुद्ध सर्वांनी एकत्र आले पाहिजे.’’
सोमवारच्या बंदमध्ये सहभागी व्हा उत्तर प्रदेशातील लखीमपूरच्या घटनेवर पवार म्हणाले, ‘‘शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलन करत असताना शेतकऱ्यांना थेट गाडीखाली चिरडले जाते. भाजपच्या नेत्यांनी केलेल्या या हत्याच आहेत. संताप वाटेल, असाच हा प्रसंग आहे. शेतकऱ्यांविषयी यांना कोणतीच आस्था नाही, ना त्यांच्या प्रश्नांविषयी भान नाही. भाजपचा निषेध करण्यासाठी सोमवारी बंद पुकारला आहे. त्यात शांततेच्या मार्गाने सहभागी व्हावे.’’
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.