सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पाटण, जावळी, सातारा, महाबळेश्वर, कऱ्हाड तालुक्यातील भात काढणीस वेग आला आहे. परतीच्या पावसामुळे सर्वाधिक नुकसान भात पिकांचे झाली असून संततधार पावसाने यंदा भात काढणी उशिरा होत असून, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे यावर्षी भात शेतीच्या उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
खरीप हंगाम सुरवातीपासून अडचणीने सुरू झाला आहे. लागवडीच्या काळात अपुरा पावसामुळे भात लागणीच्या क्षेत्रावर परिणाम झाला होता. जिल्ह्यात भाताचे ४९ हजार ८९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यंदा खरिपात ४० हजार ९७३ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली होती. पाटण, जावली, सातारा, कऱ्हाड, महाबळेश्वर या तालुक्यात भात प्रमुख पिकांपैकी एक आहे.
सुरवातीच्या संकटातून दमदार आलेल्या भात पिकांचे परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान केले आहे. काढणीला आलेले भात पीक आडवे झाले आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त १२ हजार हेक्टर आहे. या क्षेत्रात भात पिकांचे मोठे क्षेत्र आहे. या संकटातून बचाव झालेल्या भात पिकांची सध्या काढणीस वेग आला आहे. मात्र, अनेक ठिकाणी मजुर टंचाई हे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान आहे.
एकाच वेळेस बहुतांश शेतकऱ्यांची भात काढणी सुरू झाल्यामुळे मजुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाटण, जावळी, सातारा तालुक्याच्या पश्चिम भागातील भात हे प्रमुख पीक आहे. पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शासनाने नुकसानीच्या क्षेत्राचे लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून दिवाळी पूर्वी मदत द्यावी, अशी मागणी भात उत्पादक शेतकऱ्यांनी केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.