सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील आचरा परिसरातील चिंदर लब्देवाडी, साटमवाडी या परिसरात उधाणाचे खारे पाणी घुसल्यामुळे या भागातील उन्हाळी भाजीपाला, भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. खाऱ्या पाण्यामुळे शेकडो एकर जमीन नापिक होण्याची भीती देखील निर्माण झाली आहे.
आचरा परिसरात मोठ्या प्रमाणात नारळ, सुपारीच्या बागा आहेत. या शिवाय येथील शेतकरी उन्हाळी भाजीपाला, भातपीक घेतात. परंतु गेल्या काही वर्षात उधाणामुळे समुद्राचे, खाडीचे खारे पाणी शेतजमिनीत घुसून शेतीचे नुकसान होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. हे नुकसान होऊ नये म्हणून येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे खारलॅण्ड बंधारा उभारण्याची मागणी केली होती. परंतु बंधाऱ्याचे काम अजुनही मार्गी लागलेले नाही. गेले काही दिवस समुद्राला उधाण आले होते. या उधाणाचे खारे पाणी चिंदर लब्देवाडी, साटमवाडी परिसरातील शेतीत घुसले.
या पाण्यामुळे भाजीपाला, भातशेतीचे पूर्णतः नुकसान झाले होते. या शिवाय चवळी, कुळीथ, मुग शेतीचे देखील नुकसान झाले आहे. सातशे एकर शेतजमिनीत पाणी घुसल्यामुळे ही शेतजमीन देखील नापिक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात सरपंच राजेश्री कोदे, उपसरपंच दीपक सुर्वे, कृषी सहाय्यक सुनील कदम, महेंद्र मांजरेकर यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी केली.
बंधाऱ्याचे काम पूर्ण करा खाडीचे पाणी शेतजमिनीत घुसू नये म्हणून शेतकऱ्यांनी शासनाकडे खारलॅण्ड बंधाऱ्याची मागणी केली होती. बंधारा मंजूर देखील झाला परंतु, हा बंधारा सध्या अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे शेतजमिनीत खारे पाणी घुसून नुकसान होत आहे. या बंधाऱ्यांचे काम तत्काळ पूर्ण करा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.