अकोल्यातील पीकपरिस्थिती बिकट वळणावर

अकोल्यातील पीकपरिस्थिती बिकट वळणावर
अकोल्यातील पीकपरिस्थिती बिकट वळणावर

अकोला ः जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरीच्या अवघा ३० टक्केसुद्धा पाऊस झालेला नाही. जिल्ह्याची सरासरी ६९७ मिलिमीटर असताना आजवर केवळ २०० मिलिमीटर पाऊस झालेला आहे. हा पाऊसही खंडस्वरूपात पडल्याने पिकांवर मोठा ताण पडला आहे. काही भागांत २० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून जोरदार पाऊस नसल्याने दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. या परिस्थितीची पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दखल घेत काही गावांचा दौरासुद्धा केला. त्यांच्याही समोर शेतकऱ्यांनी हे वास्तव मांडले.

जिल्ह्यात बऱ्याच दिवसांपासून जोरदार पाऊस नसल्याने हजारो हेक्टरवरील खरिपाची पिके करपण्याच्या मार्गावर आली आहेत. ही पिके सुकत आहेत. पावसाचा खंड आणखी पाच-सहा दिवस वाढला तर मात्र हा हंगाम हातातून जाऊ शकतो, अशी भीती कृषी विभागाचे अधिकारीसुद्धा व्यक्त करीत आहेत. सध्या मूग, उडीद, सोयाबीन ही पिके सुकलेली बघायला मिळतात. पाणथळ भागातील पिके कशीबशी तग धरून आहेत. हलक्या जमिनीवरील पिकांची सर्वाधिक बिकट अवस्था आहे.

पालकमंत्र्यांनी अकोला तालुक्यातील कौलखेड जहाँगीर, पळसो व दहीगाव गावंडे, मूर्तिजापूर तालुक्यातील जांभा या गावातील शेत शिवाराला भेट देऊन पीकपरिस्थितीची पाहणी केली. कौलखेड जहाँगीर येथील विजय गावंडे, पूर्णाजी तायडे यांच्या शेतात भेट देऊन कपाशी व सोयाबीन पिकाची पाहणी केली. तुरळक पाऊस झाल्यामुळे या भागातील पिके अपुऱ्या पावसामुळे काही ठिकाणी करपली असल्याचे निदर्शनास आले आहे. जांभा येथील गणेश ठोकळ यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी कपाशी पिकाची पाहणी केली. या भागातील शेतीची स्थिती बिकट आहे. पळसो बढे येथील अंकुश बढे यांच्या शेताला सुद्धा भेट दिली. त्यानंतर दहीगाव गांवडे येथील पांडुरंग गावंडे व इतर ग्रामस्थांची उपस्थिती होती.

अपुऱ्या पावसामुळे जमिनीत चार ते पाच इंचापर्यंत ओलावा असून चार-पाच दिवसांत पाऊस न झाल्यास पिके जास्त दिवस तग धरू शकणार नाही. ही बाब मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्या निदर्शनास आणून देऊन शासन स्तरावर उपाययोजना करण्याबाबत प्रयत्न करू. डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री

सुरवातीच्या काळात पेरणी लायक पाऊस पडला. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु आता २० ते २२ दिवसांपासून जोरदार पाऊस पडलेला नाही. कमी पाण्यामुळे पिकाची स्थिती बिकट झाली. पुरेशी वाढ होऊ शकली नाही. उगवलेले पीक कसेबसे तग धरून आहे. एकाच गावात वेगवेगळी पीकपरिस्थिती बघायला मिळत आहे. शासनाने केवळ माहितीच न घेता तत्काळ उपाययोजना देण्याची गरज आहे.  - मनोज तायडे, शेतकरी,  कौलखेड जहाँगीर, जि. अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com