पीकविमा नामंजूर करण्याविरोधात धरणे

धरणे आंदोलन
धरणे आंदोलन

जालना : दुष्काळी स्थिती असूनही खरिपाचा पीकविमा नामंजूर केल्या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी शेतकरी संघर्ष समिती जालनाच्या वतीने गुरुवारी (ता. ६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.  जालना जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांचा विमा व वगळण्यात आलेला मोसंबी फळपीक विमा रक्कम तत्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावा, या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या संदर्भात १ जूनला जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार जून २०१८ चा टाटा एआजी विमा कंपनीने मोसंबी पिकाचा विमा घेतला होता. तो विमा मंजूरही झाला, त्यापैकी १४२० शेतकरी अजूनही विमा रक्‍कम मिळण्यापासून वंचित आहेत. कंपनीने फेरपंचनामे करून १४२० शेतकऱ्यांना विमा रक्‍कम देण्याचे मान्य केले. परंतु दहा महिने लोटूनही शेतकऱ्यांना त्या विम्याचा परतावा मिळालेला नाही. जालना जिल्ह्यात खरीप २०१८ ला आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीने सर्व खरीप पिकाचा विमा भरणा करून घेतला. मात्र जिल्ह्यात फक्‍त मूग, बाजरी या पिकांचाच विमा मंजूर केला. जालना जिल्ह्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. शिवाय पावसातील खंड याचीही माहिती शासनाकडे आहे. या सर्व बाबी शेतकऱ्यांना खरीप पीक विमा मिळवून देण्यासाठी लागू पडतात. परंतु आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनी काही शेतकऱ्यांनाच विमा संरक्षण देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीने केला होता. या प्रकरणी आठवडाभरात न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा रमेश गणपत तारगे, चंद्रकांत विनायक धांडगे यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदनातून आधीच दिला होता. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com