संपूर्ण कर्जमुक्ती, पीककर्जासाठी परभणी येथे आंदोलन

परभणी येथे सत्याग्रह आंदोलन
परभणी येथे सत्याग्रह आंदोलन

परभणी ः संपूर्ण कर्जमुक्ती देऊन सरसकट शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी प्रतिहेक्टरी ८० हजार रुपये पीककर्ज देण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे शनिवारी (ता. १) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

परभणी जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीमुळे खरीप तसेच रब्बी हंगामातील पिकांपासून शेतकऱ्यांना अत्यल्प उत्पादन मिळाले. सद्यःस्थितीत पाणी आणि चारा टंचाईमुळे शेतकरी चिंतित झाले आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी पीककर्ज मिळणे आवश्यक आहे. परंतु, बॅंकांनी अद्याप पीककर्ज वाटप सुरू केलेले नाही. कर्जमाफीची माहिती दिली जात नाही. खाते थकीत गेले आहे. व्याज भरले नाही. त्यामुळे नवीन कर्ज मिळणार नाही, असे सांगत बॅंकांचे कर्मचारी शेतकऱ्यांची अवहेलना करत आहेत.

दोन्ही हंगामात कुटुंबाच्या उपजीविकेपुरतेही उत्पन्न न झाल्यामुळे शेतकरी पीककर्जाची परतफेड करू शकत नाहीत. व्याजही भरू शकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी. सर्व बॅंकांनी कर्जदार, बिगर कर्जदार, थकबाकीदार, चालू बाकीदार शेतकऱ्यांना येत्या ८ जूनच्या आत हेक्टरी ८० हजार रुपये पीककर्ज वाटप करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सहसचिव कॅाम्रेड विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com