पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी कोल्हापुरात आक्रोश मोर्चा

पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी कोल्हापुरात आक्रोश मोर्चा

कोल्हापूर : पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी विविध पक्ष, संघटनांच्या वतीने बुधवारी (ता. २८) येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराने शेती, छोटे, मोठे उद्योग-व्यवसायांसह विविध घटकांचे अतोनात नुकसान झाले आहे. महापुरामुळे फटका बसलेल्या नागरिकांचा आक्रोश सुरू आहे. हा आक्रोश शासनापर्यंत पोचवण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी यात सहभागी झाले.

श्री. पाटील म्हणाले, की ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे महापूर येऊन कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेकडो गावांना पुराचा वेढा पडला. सुमारे ७४७ घरे या पुरामुळे धोकादायक बनली आहेत. ३५० यंत्रमाग कारखाने बाधित झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे यांना शंभर कोटी रुपयांचा फटका बसला आहे. या पुरामुळे चार लाख लोकांचे स्थलांतर झाले आहे. साखर कारखानदारीचे बाराशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आक्रोश मोर्चा...  

कोल्हापुरातील शिल्पकार, मूर्तिकारांचे जीवन महापुरामुळे उद्ध्वस्त झाले असून, अनेक मूर्ती व कारखाने पाण्यात गेल्याने या वर्षी त्याचे सावट गणेशोत्सवावर दिसत आहे. अशा मूर्तिकार व शिल्पकारांना त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळावी. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती महापुरामुळे दहा दिवस बंद ठेवाव्या लागल्याने कर्मचाऱ्यांचे पगार, वीज बिल, जीएसटी व प्राप्तिकर न भरल्याने व्यापा­ऱ्यांना विलंब शुल्काचा भुर्दंड होणार आहे. त्यामुळे बिले भरण्यास मुदतवाढ देण्याबरोबरच कर्जाचे हप्ते भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळावी.

विमा कंपन्यांकडून १५ दिवसांत नुकसान भरपाई मिळावी. त्याचबरोबर गादी कारखानदार, फर्निचर शोरुम, सराफी पेढ्या, प्रिंटिंग प्रेस, हॉटेल व्यावसायिक, इलेक्ट्रिक उपकरणे विक्रेते आदी व्यापा­यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात भरपाई देण्याबरोबरच विमा संरक्षण असणाऱ्यांना कंपन्यांकडून १०० टक्के नुकसान भरपाई तातडीने द्यावी. तसेच ज्यांच्याकडे विमा संरक्षण नाही, पण ते नियमित कर भरतात अशांना सरकारी सवलती त्वरीत देण्यात याव्यात, असे श्री. पाटील यांनी सांगितले. 

श्री. शेट्टी यांनी पूरग्रस्तांची शासन चेष्टा करीत असल्याचे सांगत सरकारच्या धोरणांवर टीका केली. उसासह सर्व खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. गुऱ्हाळ घरांचे नुकसान झाले आहे. अनेक जनावरे पुरामध्ये दगावली आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे तर बेहाल होत आहेत, त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, पंचनामे गतीने व्हावेत, अशी मागणी केली. या वेळी विविध पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com