गहू, तांदळाच्या दराच्या प्रश्‍नांमुळेच संघर्ष पेटला : शरद पवार

देशपातळीवर आणि विशेषतः दिल्लीमध्ये आज शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. गहू आणि तांदळाचे प्रचंड उत्पादन झाल्याने मार्केटींगचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
sharad pawar
sharad pawar

माळेगाव, जि. पुणे : देशपातळीवर आणि विशेषतः दिल्लीमध्ये आज शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. गहू आणि तांदळाचे प्रचंड उत्पादन झाल्याने मार्केटींगचे प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच गहू व तांदळाच्या भावाच्या संबंधीच्या प्रश्नामुळेही संघर्ष निर्माण झालेला आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले. तसेच मी कृषीमंत्री असताना पंजाब-हरियानाच्या शेतकऱ्यांना गहू थोडा कमी करा आणि फळं, अन्नधान्य उत्पादन घ्या, असं सांगितलं होतं. पण त्या लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथे राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संशोधन संस्था (नियाम) व अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) तसेच बायर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी तंत्रज्ञान सप्ताहात ते बोलत होते. याप्रसंगी सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंधारण मंत्री जयंत पाटील, मृदा पाणि जल संवर्धन मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, कृषी आयुक्त धीरजकुमार, कृषी सचिव एकनाथ डवले, संतोष भोसले, पोर्णिमा तावरे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी केव्हीकेच्या विविध प्रयोगांची व डेअरी फार्मची मान्यवरांनी पाहणी केली.  ‘‘राज्यात भरड धान्याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. पंजाब, हरियाणासारख्या राज्यात गहू व तांदूळ पीक प्रचंड प्रमाणात घेतल्यामुळे मातीवर परिणाम झाला आहे. तसेच मार्केटींगवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे दिल्लीत आज संघर्ष सुरू आहे. देशात ‘नियाम’सारख्या अनेक संस्थांमधून संशोधक मोलाचे काम करत आहेत. मात्र, प्रादेशिक परिस्थिती समोर ठेवायला ते कमी पडतात,’’ असे मत खासदार पवार यांनी व्यक्त केले.   ‘‘कृषी विज्ञान केंद्राने तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून त्याची लोकांमध्ये वाच्यता करण्यासाठी सप्ताह आयोजित केला आहे. त्यांनी मागील पन्नास वर्षात दूध, फळं, माती व्यवस्थापन, पाणीवापर अशा विविध विषयांवर अभ्यास केला. शेतकऱ्यांना नवे देण्याचा प्रयत्न केला. नियाम, कृषीविद्यापिठांची मदत घेऊन शेतीला आणखी दर्जेदार करावे,’’ असे आवाहन त्यांनी केले. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक त्रिलोचन मोहापात्रा यांनी ऑनलाइन संवाद साधला. याप्रसंगी सुहास जोशी, हिमांशू पाठक, सारंग नेरकर यांनी संशोधन सादर केले. ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

‘ट्रस्ट डेअरी’ उपक्रमाला सुरुवात पुणे व सातारा जिल्ह्यातील डेअरी उद्योगाचा शाश्वत विकास करण्यासाठी तसेच ग्राहकाला सुरक्षित व स्वच्छ दूधपुरवठा करण्यासाठी 'ट्रस्ट डेअरी' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याव्दारे शासन, शेतकरी, दूध संस्थाचालक, दूध प्रक्रिया संस्था यांना जोडण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, सोलीडारीडॅड एशिया, न्युट्रीको, गोविंद मिल्क व बारामती अॅग्रो या पाच संस्थांनी सामंजस्य करार केला. शरद पवार यांच्या हस्ते कराराचे प्रकाशन करण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com