‘पाटबंधारे’च्या अधिकाऱ्यांचा पाणी न सोडल्याबद्दल सत्कार !

आवर्तनासाठी आंदोलन
आवर्तनासाठी आंदोलन

वालचंदनगर, जि. पुणे  ः नीरा डाव्या कालव्याच्या ४६ क्रमांकाच्या वितरिकेला पाणी सोडण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी गांधीगिरी करत पाटबंधारे अधिकाऱ्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. अधिकाऱ्यांनी आज (ता. ११) पाणी सोडण्याचे आश्‍वासन तिसऱ्यांदा दिले. 

इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील कळंब, रणगाव, लालपुरी, रत्नपुरी परिसरातील शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक होऊ लागले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी २९ एप्रिल रोजी पहिले ठिय्या आंदोलन केले. या वेळी शेतकऱ्यांना ५ मे रोजी पाणी सोडण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. पाणी न सोडल्याने शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. ७) दुसऱ्यांदा आंदोलन केले. त्या वेळी शेतकऱ्यांना शुक्रवारी (ता. १०) पाणी सोडणार असल्याचे सांगण्यात आले होते.

शेतकऱ्यांनी शुक्रवारी पाटबंधारे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाणी सोडण्याची विनंती केल्यानंतर पाणी सोडण्यास टाळाटाळ करून १५ मे रोजी पाणी सोडणार असल्याचे कळविले. त्यानंतर शेतकरी आक्रमक झाले. ते सकाळी जंक्‍शन (ता. इंदापूर) जवळील नीरा डाव्या कालव्याच्या भराव्यावर जमले. त्या वेळी अंथुर्णे पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी श्‍यामराव भोसले व कर्मचाऱ्यांचा शेतकऱ्यांनी गांधीगिरी पद्धतीने सत्कार करून तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. त्यानंतर आज (ता. ११) ४६ क्रमांकाच्या वितरिकेला पाणी सोडण्याचे तिसऱ्यांदा आश्‍वासन दिले.

या वेळी कर्मयोगी कारखान्याचे संचालक राजेंद्र गायकवाड, बाळासाहेब डोंबाळे, ॲड. पांडुरंग गायकवाड, हर्षवर्धन गायकवाड, बबलू पवार, प्रकाश साळुंके, बापूराव अर्जुन, रणजित पाटील, कुमार पवार, माउली मेटकरी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com