एफआरपीची मोडतोड केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन

एफआरपीप्रश्नी कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन
एफआरपीप्रश्नी कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन

कोल्हापूर  : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यतील बहुतांशी तालुक्‍यांमध्ये साखर कारखान्याच्या विभागीय कार्यालयांना कुलपे लावण्याचे आंदोलन सुरू केल्याने ऊस पट्ट्यात तणाव निर्माण झाला आहे. हातकणंगले, शिरोळ, करवीर, कागल तालुक्‍यांतील अनेक गावांतील कारखान्यांच्या कार्यालयाला स्वभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टाळे लावले. अनेक ठिकाणी कार्यालयातील कार्यकर्ते व आंदोलकांत वाद निर्माण झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. 

गेल्या दोन महिन्यांपासून उस पट्यात एफआरपीची बिले जमा न झाल्याने शेतकऱ्यांचा रोष होता. कारखानदारांनी बैठका घेऊनही त्यांच्यात एकमत होत नव्हते. मुख्यमंत्र्यांना याप्रश्‍नी निवेदन देऊन झाल्यनंतर मुख्यमंत्र्यांनी काहीच हालचाली न केल्याने अखेर कारखान्यांनी बैठक न घेताच एफआरपीच्या ८० टक्के इतकी रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी उशिरा कसबा बावड्यातील राजाराम साखर कारखान्याने नोव्हेंबरअखेरपर्यंत गाळप झालेल्या उसास टनाला २३०० रुपये याप्रमाणे बिले जमा केली. इतर कारखान्यांनीही याच रकमेच्या याद्या तयार करून बिले जमा करण्याला प्राधान्य दिले. काही कारखान्यांनी सोमवारी बिले जमा करीत असल्याचे सांगितले. हे वृत्त समजताच स्वभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. 

एकरकमी एफआरपी दिल्याशिवाय येथून पुढे हंगाम सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत शनिवारी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणच्या कारखान्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचे सत्र सुरू केले. पहिल्यांदा कुरुंदवाड येथील कार्यालयाला टाळे ठोकले. शनिवारी दुपारपर्यंत अनेक तालुक्‍यांच्या ठिकाणच्या व महत्वाच्या गावांमधील कार्यालयात आंदोलन सुरू होते. तुटलेला ऊस कारखान्यापर्यंत जाईपर्यंत उसाचे नुकसान करायचे नाही, अशी भूमिका आम्ही घेतल्याचे ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी सांगितले.

तुटलेला ऊस गेल्यानंतर मात्र तोडणी आम्ही सुरू करू देणार नाही. आमची सहकार व कारखानदारांकडून फसवणूक झाली आहे. जोपर्यंत एकरकमी एफआरपी जमा होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे श्री. काटे यांनी सांगितले. राजू शेट्टी नांदणी (ता. शिरोळ) येथे भविष्यातील आंदोलनाची दिशा जाहीर करतील. त्यानुसार पुन्हा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असे श्री. काटे यांनी सांगितले. 

आंदोलन चुकीचे ः सदाभाऊ खोत ‘स्वभिमानी’ने सुुरू केलेले आंदोलन चुकीचे असल्याची टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. एकरकमी एफआरपी सद्यःस्थितीत देणे शक्‍य नाही, असे या प्रश्‍नी लढणाऱ्या संघटनांनाही माहीत आहे. तरीही आंदोलन होत आहे. कारखान्यांना मदत देण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेऊन उपाययोजना आखत असल्याचे श्री. खोत यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com