मुंबईत दुधाचा एक थेंबही येऊ देणार नाही : खासदार राजू शेट्टी

राजू शेट्टी
राजू शेट्टी

मुंबई   : गायीच्या दुधाला ५ रुपये थेट अनुदान दिले नाही, तर सोमवारपासून (ता. १६) मुंबईचा दूधपुरवठा तोडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.  

मुंबई येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार शेट्टी बोलत होते. या वेळी ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, राज्य प्रवक्ते अनिल पवार उपस्थित होते. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दूध व्यवसाय तोट्यात गेला आहे, असे असताना दुधाच्या बाबतीत शासनाने काहीही केले नाही. त्यामुळे १६ जुलैपासून मुंबईत दुधाचा एक थेंबही येऊ देणार अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे. वेळप्रसंगी वारकऱ्यांना दूध वाटू; पण मुंबईत दूध कोणत्याही परिस्थितीत येऊ देणार नाही, असे शेट्टी यांनी सांगितले.

पुण्यात साखर आणि दूध दर प्रश्नी २९ जून रोजी मोर्चा काढून सरकारला इशारा दिला होता. मात्र, सरकारने याकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे दूध संकलन आणि दूध विक्री बंद आंदोलनामुळे जी परिस्थिती उद्‌भवेल त्यास सरकार जबाबदार असेल. पण, यापुढे शेतकऱ्यांची लूट होऊ देणार नाही, असा इशारा खासदार शेट्टी यांनी दिला. दुध भुकटी, पावडर आणि लोणी जीएसटीमधून वगळावी अशी मागणीही त्यांनी केली.  

सध्या दूध उत्पादक घटलेल्या दरामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. दुधाचा उत्पादन खर्च ३५ रुपये लिटरवर जाऊन पोहोचलाय. मात्र, सध्या शेतकऱ्यांना १५ रुपये दर मिळतोय. याबाबत दूधसंघांच्या प्रतिनिधींसह प्रत्यक्ष भेटून सरकारकडे याबाबतची समस्या मांडली होती. यावर सरकारने दूध भुकटीसाठी ३ रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ५३ कोटी रुपये खर्च ही करण्यात आला आहे. मात्र, या ५३ कोटी रुपयांपैकी एक रुपयाही दूध उत्पादकांना मिळाला नाही. सरकारने या प्रश्नाकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज असताना जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच दूध विक्री करायची नाही असा निर्णय घेण्यात आला असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

दूध प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांना काहीही बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. दूध उत्पादकांसाठी चंद्रकांत पाटील यांनी काय केले आहे ते अगोदर सांगावे आणि नंतर बोलावे असेही राजू शेट्टी म्हणाले. गोवा आणि कर्नाटक जर दुधाला अनुदान देत असेल तर महाराष्ट्र सरकारला ते का शक्य होत नाही, असा सवाल खासदार शेट्टी यांनी उपस्थित केला.

‘परराज्यातील दूधदेखील महाराष्ट्रात येऊ देणार नाही’ राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर भागातील दूध बंद झाल्यानंतर गुजरात आणि कर्नाटक या राज्यातून मुंबईत दूध आणण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, गनिमीकावा करून कोणत्याच राज्यातून महाराष्ट्रात दुधाचा एकही थेंब येऊ दिला जाणार नाही, असे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com