सातारा, सांगली, कोल्हापुरात ऊसदरप्रश्‍नी रविवारी ‘चक्का जाम’

या सरकारला ‘एफआरपी’चे तुकडे करायचे आहेत. सरकारमधील काही नेत्यांना ही शेतकरी चळवळ मोडीत काढायची आहे. यावर्षी चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर आम्ही कोणतीच चर्चा करणार नाही. सहकारमंत्र्यांनी ‘एफआरपी’ दिली नाही, तर न्याय मागायचा कोणाकडे. आता आंदोलनाबाबत तडजोड नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतच राहणार. - राजू शेट्टी, खासदार
खासदार राजू शेट्टी
खासदार राजू शेट्टी

सांगली  : मला उसाला दर हा एकच प्रश्न दिसतोय, यासाठी मी कुणालाही अंगावर घेण्यास तयार आहे. शेतकऱ्यांचा संयम संपण्याआधी सरकारने ऊस दराबाबत योग्य निर्णय घ्यावा; अन्यथा २०१३ मध्ये जसा उद्रेक झाला होता, त्या प्रमाणे पुन्हा उद्रेक होईल. ऊस दराचा प्रश्‍न तातडीने सोडवला नाही तर सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत रविवारी (ता.११) चक्का जाम आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ऊसदराचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत जाण्याची हिम्मत नाही. दिल्लीत त्यांना किंमत नाही, हे त्यांना माहीत नसावं का, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.

सांगली येथे बुधवारी (ता.७) आयोजित पत्रकार परिषदेत खासदार शेट्टी बोलत होते. या वेळी ते म्हणाले, की आमच्या ऊस परिषदेत वेगवेगळे ठराव केले होते. उसाला एफआरपी अधिक २०० रुपये असा पहिला ठराव होता. दुसरा ठराव उचलीसंदर्भात होता. तरीदेखील सांगली जिल्ह्यातील काही कारखानदारांनी कारखाने सुरू केले. केंद्र सरकारने जाहीर केलेली ‘एफआरपी’ आधी द्यावी. ज्या कारखान्यांनी ‘एफआरपी’ दिली नाही, त्यांचा गाळप परवाना रद्द करावा अशा सूचना असताना  मग पोलिस संरक्षणात कारखाने कसे सुरू होतात, असा सवाल त्यांनी केला. हे सरकार शेतकऱ्यांचे पैसे बुडवणारे आहे. या भाजपमध्ये पैसे बुडवणारे हे बहुतांश कारखानदार आहे. आम्ही या सरकारला धडा शिकवू, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी ऊस दराबाबत जी भूमिका घेतली त्याचे आम्ही समर्थन केले. पण या मागणीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी छेद दिला. मग सरकारची वेगळी भूमिका आहे काय, हे स्पष्ट करावे. सरकार फक्त घोषणा करत आहे. केवळ घोषणा करून प्रश्न सुटत नाहीत. कारखानदार कोणतीही भूमिका स्पष्ट करत नाहीत. अनेक भागात ऊस तोड सुरू आहे. ऊस घेऊन जातो आणि जमेल तेवढे पैसे देतो असे चालणार नाही. कारखाने असेच सुरू राहिले तर आमच्या मागण्या मान्य झाल्या असे आम्ही समजू. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तिजोरी खाली करण्यास तयार असल्याने मुख्यमंत्री फडणवीस सातत्याने सांगत आहेत. मग घोडे अडलेय कुठे. या स्थितीत आम्ही शनिवारपर्यंत (ता.१०) थांबू, ऊस दराबाबत मागण्या मान्य न झाल्यास साताऱ्यासह दक्षिण महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com