शेतकरी संघटनेचे आजपासून कांदा सत्याग्रह आंदोलन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः निवडणुका जिंकण्यासाठी कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांचा बळी देण्याची सुरू झालेली प्रथा बंद झाली पाहिजे. निर्यात खुली करून, कांदा व्यापारावरील सर्व निर्बंध हटवण्यासाठी आजपासून (ता. ७) राज्यात कांदा सत्याग्रह आंदोलन सुरू केले जात असून कांदा बाजार बंद केले जाणार आहेत. निर्यात खुली करून सर्व निर्बंध हटविल्याचे आदेश पारित होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी सांगितले.  कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरील अन्याय दूर होईपर्यंत शिवसेना-भाजप महायुतीच्या सभांवर बहिष्कार घाला, त्यांना मते देऊ नका असे आवाहन घनवट यांनी केले. 

नगर येथे रविवारी (ता. ६) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. घनवट बोलत होते. नगरला येथील व्यापारी भवनमध्ये शेतकरी संघटनेची उच्चाधिकार बैठक झाली. बैठकीला श्री. घनवट यांच्यासह शेतकरी संघटना न्यासाचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी, स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मावेंद्र काचोळे, महिला आघाडीच्या सीमाताई नरोडे, युवा आघाडीचे अभिमन्यू शेलार, शशिकांत भदाणे, अर्जुन बोराडे, संतु पाटील झांबरे, विक्रम शेळके, बापुराव आढाव, शरद गद्रे, कारभारी कणसे, डॉ. संजय कुलकर्णी, धनाजी धुमाळ, अंबादास चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. घनवट म्हणाले, की निर्यात बंदी व साठ्यावरील मर्यादेमुळे कांद्याचे दर कोसळले आहेत. साठ्यांवरील मर्यादेमुळे व्यापाऱ्यांना कांदा खरेदी करणे अशक्य झाले आहे. घाऊक व्यापाऱ्याला पाच क्विंटलची मर्यादा घालणे म्हणजे कांदा व्यापाराचा अभ्यास नसणे आणि कांदा व्यापारी, शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन दोन टप्प्यात असेल. कांद्यावरील निर्बंध हटेपर्यंत कांदा व्यापार बंद ठेवण्यात येईल व शेतकऱ्यांना पूर्ण व्यापार स्वातंत्र्य व तंत्रज्ञान स्वातंत्र्य दिले जात नाही तो पर्यंत भाजप- शिवसेनेच्या सभांवर बहिष्कार घालणे व त्यांच्या उमेदवारांना मतदान न करण्याची भूमिका शेतकरी घेतील.  शहरी ग्राहक संघटित मतांच्या ताकदीवर सरकारे पाडतात. त्यांची दहशत राज्यकर्त्यांच्या मनावर आहे. निवडून येण्यासाठी शेतकरी, व्यापाऱ्यांचा बळी दिला जातो. कोणताही असा निर्णय घेण्याअगोदर सरकार कांदा व्यापारी किंवा शेतकरी प्रतिनिधींचा विचार घेण्याची तसदी सुद्धा घेत नाही हे अत्यंत घातक आहे. या पुढे असा अन्याय सहन करण्याची वेळ येऊ नये म्हणून या निवडणुकीत शेतकऱ्यांनी आपल्या मताचा हिस्का दाखवून द्यावा. शासनाने शेतकरी व व्यापारी प्रतिनिधींशी चर्चा करून निर्बंध हटविण्याबाबत चर्चा करावी, अशी अपेक्षा श्री. घनवट यांनी व्यक्त केली.     ‘...तर जशास तसे उत्तर’ अनिल घनवट म्हणाले, की शेतकरी हितासाठी संघटना काम करत आहे. निर्यात खुली करून, कांदा व्यापारावरील सर्व निर्बंध हटविण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे. हे आंदोलन अधिक तीव्र होईल. आंदोलन कोणी मोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशाच तसे उत्तर दिले जाईल.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com