हिंगोली : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व सर्वोदयी विचारवंत डॉ. गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (ता. ७) वसमत येथील उपविभागीय कार्यालयासमोर मराठवाड्याच्या पाणीप्रश्नी मराठवाडा सिंचन व पाणी परिषदेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.
माजी खासदार व्यंकटेश काब्दे, माजी राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगांवकर, आमदार जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार पंडितराव देशमुख, ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव दगडू (दादा), अॅड. रामचंद्र बागल, रमेश आंबेकर आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
मराठवाड्याच्या हक्काचे, जायकवाडी धरणातून समन्यायी पाणी देण्यात यावे. कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे २७ टीएमसीपाण्यापैकी ७ टीएमसी पाणी ताबडतोब देऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ४ वर्षांपूर्वी दिले होते ते अंमलात आलेले दिसत नाही. ते पाणी ताबडतोब मिळाले पाहिजे. तापी खोऱ्यातील शिल्लक पाणी मराठवाड्याकडे वळवण्याबाबतचा विचार झाला होता. तापी खोऱ्यातील शिल्लक पाणी आंध्र प्रदेश व गुजरातकडे विनाकारण जात आहे. तापी खोऱ्यातील शिल्लक पाणी तातडीने मराठवाड्याकडे वळविण्यात यावे. कोयना जलविद्युत केंद्रातील पाणी समुद्रात वाहून जाते ते पाणी मराठवाड्याकडे वळविण्याची मागणी पूर्ण करण्यात यावी. येलदरी धरणाच्या वरच्या भागात खडकपूर्णा धरण नंतर बांधण्यात आले त्या वेळी मराठवाड्यातील जनतेने खडकपूर्णा धरण बांधू नये यासाठी आंदोलन केले होते. आता आमची मागणी अशी आहे की, प्रथम येलदरी धरणात पाणी जमा करत जावे व येलदरी धरण भरल्यानंतरच खडकपूर्णा धरणात पाणी जमा करावे. इसापूर धरणाच्या वरील भागात आणखीन काही धरणे बांधली जात असल्याचे कळते, यामुळे इसापूर धरणात पाणी येणार नाही म्हणून इसापूरच्या वरच्या भागात इतर धरणे बांधू नयेत. कळसूबाई शिखरापासून पाणलोट क्षेत्राच्याआधारे बीड जिल्ह्यापर्यंत पाणी आणण्याची एक योजना लातूरचे कै. जयंत वैद्य यांनी सादर केली होती त्या योजनेची अंमलबजावणी करावी किंवा मराठवाड्यातील जलतज्ज्ञांची समिती स्थापन करू या संबंधीचा आराखडा बनवावा व तो अंमलामध्ये आणावा. पूर्ण हिंगोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा. दुष्काळी कामे म्हणून प्रत्येक गावात गावतळे, शक्य तेथे पाझर तलाव खोदावेत. प्रत्येक गावातील नदीनाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करावे. नदीनाल्यांवर जागोजागी बंधारे घालून पाणी अडवण्याची व्यवस्था करावी. मागेल त्या शेतकऱ्यास शासनाच्यावतीने शेततळे बांधून द्यावे. मराठवाड्यातील जलतज्ज्ञांची एक समिती स्थापन करावी व या समितीने मराठवाड्यातील पडणारा पाऊस वाहून जाऊ नये म्हणून पाणी साठवण्याच्या स्थानिक योजना आखाव्यात व शासनाने त्या अंमलामध्ये आणाव्यात.