शुक्रवार ते रविवार (ता. १५ ते १७) दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल व किमान तापमानात वाढ संभवते. आकाश अंशत: ढगाळ राहील. उन्हाळी भात १५ ते १७ मे दरम्यान हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तयार झालेल्या भात पिकाची सकाळच्या वेळेस जमिनीलगत कापणी व मळणी करून भात सुरक्षित ठिकाणी ठेवावे. खरीप भात
खरीप भात लागवडीसाठी जमिनीची नांगरट करून जमीन उन्हात तापू द्यावी, यामुळे तणांचा बंदोबस्त होण्यास मदत होईल. खरीप भात लागवडीसाठी आपल्या आवश्यकतेनुसार भात बियाण्यांची उपलब्धता करून घ्यावी. कृषी विद्यापीठाने शिफारशीत जाती- रत्नागिरी-१, रत्नागिरी-२, रत्नागिरी-३, रत्नागिरी-७, कर्जत-३ व कर्जत-५ जाड दाण्यांसाठी, रत्नागिरी-४, रत्नागिरी-५, रत्नागिरी-६, रत्नागिरी-२४, फोंडाघाट-१, पालघर-१, पालघर-२, कर्जत-२, कर्जत-६, कर्जत-७, कर्जत-८, कर्जत-९, कर्जत-१० तसेच सह्याद्री, सह्याद्री-२, सह्याद्री-३, सह्याद्री-४ आणि सह्याद्री-५ संकरीत भात बारीक दाण्यांसाठी, कर्जत-४ अतिशय बारीक दाण्यासाठी आणि खार जमिनीसाठी पनवेल-१, पनवेल-२ व पनवेल-३ क्षार प्रतिकारक भात जाती कोकण विभागासाठी खरीप हंगामासाठी शिफारसीत केल्या आहेत. जाड दाण्याच्या जातीसाठी एकरी २० ते २४ किलो, बारीक व अतिशय बारीक दाण्याच्या जातीसाठी एकरी १४ ते १६ किलो आणि संकरीत जातीसाठी एकरी ८ किलो बियाणे वापरावे. बियाण्यांच्या उपलब्धतेसाठी कृषी विद्यापिठाच्या बियाणे विभागाच्या ८२७५०१३३९६ या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. १५ ते १७ मे दरम्यान हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घ्यावी. काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची ‘नूतन’ झेल्याच्या सहाय्याने चौदा आणे (८० ते ८५ टक्के) पक्वतेला देठासह सकाळी १० वाजेपर्यंत काढणी करावी. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. आंब्याची फळे काढल्यानंतर सावलीमध्ये ठेवावीत. आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी. फळे काढणीच्या किमान १५ दिवस अगोदर झाडावर कोणतीही फवारणी करू नये. फळकूज या काढणी पश्चात बुरशीजन्य रोगापासून आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी काढणी नंतर लगेचच फळे ५२ अंश सेंल्सिअस तापमानाच्या पाण्यात १० मिनिटे बुडवून काढावीत. नंतर फळे पिकविण्यासाठी ठेवावीत. शिफारस केलेल्या कोरूगेटेड फायबर बॉक्समध्ये फळे पॅकिंग करावीत. आंबा बागेत फळमाशी व फळे पोखरणारी अळी इ. किडीच्या प्रादुर्भावामुळे गळलेली फळे वेळोवेळी गोळा करून नष्ट करावीत. बागेत स्वच्छता ठेवावी. बाष्पीभवनामध्ये वाढ होत असल्याने, नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पाणी देण्याची व्यवस्था करावी. आंब्यांच्या झाडावर खोड किडीचा प्रादुर्भाव झाडाचे खोड व फांद्यावर दिसून येतो. ही कीड फांद्या पोखरत असल्याने पोखरलेल्या फांद्या वाळू लागतात. किडीच्या सर्वेक्षणासाठी बागेतील झाडांची नेहमी पाहणी करावी. किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी तारेच्या हुकाने खोडातील अळ्या काढून टाकून छिद्रात प्रवाही क्लोरपायरीफॉस (२० टक्के) १० मि. ली. सम प्रमाणात पाणी मिसळून इंजेक्शनच्या सहाय्याने ओतावे. छिद्र बुजवून घ्यावे. झाडाला कोणत्याही प्रकारे इजा करू नये. इजा झाल्यास त्याला बोर्डो पेस्ट लावून जखम झाकावी. (ॲग्रेस्को शिफारस) आंबा फळांची काढणी झाल्यावर घन लागवड (५ x ५ मी. किंवा ६ x ४ मी.) असलेल्या आंबा बागांमध्ये नियमित छाटणी करावी. या मध्ये उंची कमी करणे, फांद्या एकमेकांमध्ये गेल्या असल्यास छाटणे आणि वाळलेल्या फांद्या काढून टाकणे या गोष्टींचा अंतर्भाव करावा. घन लागवड असलेल्या बागांमधील कलमांची उंची दोन ओळींच्या अंतराच्या ८०% इतकी ठेवावी. बाष्पीभवनामध्ये वाढ होत असल्याने, नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना पाणी देण्याची व्यवस्था करावी. काजू बागेतील वाळलेल्या, रोगट फांद्या काढून बागेत स्वच्छता ठेवावी. फांद्या काढलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी. तापमानात वाढ व आर्द्रतेत घट संभवत असल्याने नारळ बागेस ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. तसेच आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी नारळाच्या शेंडया पुराव्यात आणि झावळ्यांचे आच्छादन करावे. नवीन लागवड केलेल्या नारळाच्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी. तापमानात वाढ व आर्द्रतेत घट संभवत असल्याने सुपारी बागेस ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. सुपारीचे बागेतील रोगट शिंपुटे, वाळलेल्या झावळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. बागेत स्वच्छता ठेवावी. पाण्याची उपलब्धता असल्यास खरीप हंगामासाठी वांगी, मिरची आणि टोमेटो भाजीपाला पिकाची रोपे तयार करावीत. त्यासकरिता ३ मी. लांब X १ मी. रुंद X १५ से.मी. उंचीच्या गादीवाफ्यावर प्रती चौरस मीटर ५ किलो शेणखत, ३५ ग्रॅम युरिया, १०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व २५ ग्रॅम म्युरेट ओफ पोटेश मिसळून भाजीपाला बियाणांची पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम हे बुरशीनाशक ३ ग्रॅम प्रती किलो प्रमाणे चोळावे. तसेच रोपांचे मर रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी ३ ते ४ दिवस वाफ्यावर १ टक्का बोर्डोमिश्रणाने भिजवण करावी. (ॲग्रेस्को शिफारस) फळबाग रोपवाटीका तापमानात होणारी वाढ आणि दुपारच्या होणारी घट यामुळे, फळबाग रोपवाटीकेस पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच गरजेनुसार रोपांसाठी सावली करावी. संपर्क - ०२३५८- २८२३८७ (कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)