पेरणीयोग्य पाऊस झालेला असल्यास जमिनीत पुरेसा ओलावा व वापसा असल्याची खात्री करावी. त्यानंतरच पेरणी न झालेल्या ठिकाणी कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, तीळ, सुर्यफूल, एरंडी इ. पिकांची पेरणी करावी. पेरणी करत असताना आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. पुढील काळात मुग, उडीद, ज्वारी, भुईमूग या पिकांची पेरणी करू नये. सोयाबीन
सोयाबीन पिक पिवळे पडत असल्यास (क्लोरोसीस) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात वाफसा स्थिती राहील, अशी व्यवस्था करावी. त्यानंतर ०.५ ते १ टक्के फेरस सल्फेटची किंवा ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड (II) ५ ग्रॅम प्रती लीटर पाणी या प्रमाणे पावसाची उघडिप पाहून फवारणी करावी. पाने खाणाऱ्या अळ्या व खोडकिड व्यवस्थापनासाठी, प्रोफेनाफॉस (५० टक्के) ४०० मिली किंवा थायामेथोक्झाम (१२.६ टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५ टक्के) (संयुक्त किटकनाशक) ५० मिली प्रती एकर या प्रमाणे पावसाने उघडिप दिल्यास फवारणी करावी. पेरणी केलेल्या पिकात पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. पिकातील अतिरीक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. लागवड करून एक महिन्याचा कालावधी झाला असल्यास नत्र खताचा दुसरा हप्ता ४० किलो नत्र प्रती हेक्टरी द्यावा. खोड किडीच्या व्यवस्थापनासाठी, कीडग्रस्त पोंगे काढून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, त्यांची नियंत्रणासाठी थायामेथोक्झाम (१२.६ टक्के) अधिक लॅंबडा सायहॅलोथ्रीन (९.५ झेडसी) (संयुक्त कीटकनाशक) ०.५ मिली किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ०.४ मिली प्रती लीटर पाणी या प्रमाणे पोंग्यात पडेल या प्रमाणे फवारणी करावी. पेरणी केलेल्या पिकात पाणी साचणार नाही, अतिरीक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. रसशोषक किडींच्या (पांढरी माशी, पाकोळी) व्यवस्थापनासाठी, क्लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) ३ मिली प्रती लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. सद्य स्थितीत बऱ्याच ठिकाणी ऊस पिकात हुमणीच्या अळ्या दिसून येत आहेत. या किडीच्या व्यवस्थापनासाठी मेटारायझीम ॲनोसोप्ली हे बुरशीजन्य कीटकनाशक ४ किलो (अधिक प्रादुर्भावाच्या स्थितीत १० किलो) प्रती एकर या प्रमाणे जमिनीतून द्यावे. लागवड केलेल्या ऊस पिकात जास्त काळ पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. सद्य परिस्थितीत बऱ्याच ठिकाणी हळद पिकात हुमणीच्या अळ्या दिसून येत आहेत. याच्या व्यवस्थापनासाठी मेटारायझीम ॲनोसोप्ली हे बुरशीजन्य कीटकनाशक ४ किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास १० किलो) प्रती एकर जमिनीतून वापरावी. पिकातील अतिरीक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. लिंबुवर्गीय फळझाडांवरील फुलपाखरांच्या व्यवस्थापनासाठी, क्विनॉलफॉस (२५ ईसी) २ मिली प्रती लीटर पाणी या प्रमाणे पावसाची उघडिप पाहून फवारणी करावी. संत्रा/ मोसंबी फळबागेत पाणी साचणार नाही, अतिरीक्त पाण्याचा निचरा होईल याकडे लक्ष द्यावे. डाळिंब बागेतील फुटवे काढावेत. पावसाच्या अतिरीक्त पाण्याचा निचरा होईल, असे नियोजन करावे. मिरची पिकावरील रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रती लीटर पाणी थायामेथोझाम (१२.६ टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५ टक्के) (संयुक्त किटकनाशक) किंवा पायरीप्रॉक्झीफेम (५ टक्के ईसी) अधिक फेनप्रोपॅथ्रीन (१५ टक्के ईसी) (संयुक्त किटकनाशक) १ मिली. तुती रेशीम उद्योग तुती किटक संगोपनगृहात पावसाळी किंवा ढगाळ वातावरणात रेशीम किटक कातीवर बसले असता आर्द्रता ६५ टक्के व तापमान २५ अंश सेल्सिअस असणे गरजेचे आहे. आर्द्रता ८५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास कात अवस्थेत बेडवरील पाने सुकत नाहीत. यासाठी पातळ स्वच्छ कापडाच्या साह्याने बेडवर चुना धुरळणे आवश्यक आहे. पाने वाळण्यास मदत होते. वेळेवर कात बसणे. कातीवरून उठणे या क्रिया व्यवस्थित होतात. संपर्क डॉ. कैलास डाखोरे (मुख्य प्रकल्प समन्वयक), ९४०९५४८२०२ प्रमोद शिंदे (संशोधन सहयोगी), ७५८८५६६६१५ (ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)