फळे, भाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सरकारचे प्रोत्साहन : सहकारमंत्री

सोलापूर कृषी महोत्सव
सोलापूर कृषी महोत्सव

सोलापूर  ः राज्यातील महिला बचत गट, विकास सोसायट्या आणि शेतकरी कंपन्या यांसारख्या सुमारे पाच हजार संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न सरकार करते आहे. त्यासाठी शेतीपूरक उद्योग, फळे व भाजीपाल्यावरील प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी मूल्यवर्धनाची ही साखळी आवश्‍यक आहे, असे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

राज्य शासनाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) वतीने आयोजित कृषी महोत्सव- २०१८ या महोत्सवाचे उद्‌घाटन रविवारी (ता. ११) मंत्री देशमुख यांच्या हस्ते येथील होम मैदानावर झाले, त्या वेळी ते बोलत होते.

 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री विजयकुमार देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, महापौर सौ. शोभा बनशेट्टी, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, पक्षनेते आनंद तानवडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, बॅंक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक शशिकांत भावसार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, अभिनव फार्मर्स क्‍लबचे ज्ञानेश्‍वर बोडके आदी या वेळी उपस्थित होते. 
 
पणनमंत्री देशमुख म्हणाले, की शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. अन्य प्रयोग पाहून आल्याशिवाय आपल्याला शेती करता येणार नाही. दुसऱ्याच्या अनुकरणानेच आपल्याला काही करता येईल, त्यासाठीच हा महोत्सव भरविला आहे. शेतीमालाच्या उत्पादनापेक्षा मार्केटिंग, विक्रीला महत्त्व आले आहे. शेतकरी नेमका इथेच कमी पडतो. पणन मंडळाकडून त्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. थेट विक्री व्यवस्था, खुले व्यवहार, नियमनमुक्ती, आठवडे बाजार यांसारखे उपक्रम त्याचाच भाग आहेत.
 
आता तर शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याबाबत सरकार विचार करते आहे; पण बाजाराची गरज लक्षात घेऊन उत्पादन करायला हवे. आज सेंद्रिय शेती उत्पादनांना सर्वाधिक मागणी आहे. भविष्यात सेंद्रिय शेतीला चांगले दिवस आहेत, हे लक्षात घेऊन आतापासूनच सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. फळे व भाजीपाल्यावरील प्रक्रियेतून मूल्यवर्धन वाढवले पाहिजे. कमी खर्च, शाश्‍वत उत्पन्न देणारी किफायतशीर शेती करायला हवी. सेंद्रिय शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो. आज राज्यात शेतमालाच्या मार्केटिंगसाठीच १३२ आठवडी बाजार सुरू केले आहेत, असेही श्री. देशमुख म्हणाले.
 
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, की शेतीला पूर्वी कनिष्ठ मानले जायचे; पण आज तीच पहिल्या क्रमांकावर आहे. मजुरांची वानवा सांगितली जाते; पण मुळात कुशल मजूर नाहीत, ही आपली समस्या आहे. त्याचा विचार व्हायला हवा. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी हा महोत्सव आयोजिला आहे. डाळिंब, द्राक्ष उत्पादनामध्ये जिल्ह्यातील शेतकरी सक्षम आणि ताकदीचे आहेत, त्यांना आणखी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. 

याच कार्यक्रमात जिल्ह्यातील आत्मासह कृषी विभागातील उत्कृष्ट कामगिरी बजावणारे अधिकारी, प्रयोगशील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी कंपन्या यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे यांचा विशेष सन्मान पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.

होम मैदानावर विस्तीर्ण अशा पटांगणात हा कृषी महोत्सव भरवण्यात आला आहे. शेतीविषयक विविध माहिती, नवे ज्ञान, तंत्रज्ञान, कृषी अवजारे, विविध शेती उत्पादने, पुस्तके, खते- बियाणे कंपन्यांसह पशुप्रदर्शन आणि धान्य खरेदी- विक्रीची दालने या ठिकाणी आहेत. येत्या गुरुवारपर्यंत (ता. १५) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत हा महोत्सव सुरू राहणार आहे. 

 

 
 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com