सोलापूर ः राज्यातील महिला बचत गट, विकास सोसायट्या आणि शेतकरी कंपन्या यांसारख्या सुमारे पाच हजार संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न सरकार करते आहे. त्यासाठी शेतीपूरक उद्योग, फळे व भाजीपाल्यावरील प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी मूल्यवर्धनाची ही साखळी आवश्यक आहे, असे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.
राज्य शासनाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) वतीने आयोजित कृषी महोत्सव- २०१८ या महोत्सवाचे उद्घाटन रविवारी (ता. ११) मंत्री देशमुख यांच्या हस्ते येथील होम मैदानावर झाले, त्या वेळी ते बोलत होते.
याच कार्यक्रमात जिल्ह्यातील आत्मासह कृषी विभागातील उत्कृष्ट कामगिरी बजावणारे अधिकारी, प्रयोगशील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी कंपन्या यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे यांचा विशेष सन्मान पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
होम मैदानावर विस्तीर्ण अशा पटांगणात हा कृषी महोत्सव भरवण्यात आला आहे. शेतीविषयक विविध माहिती, नवे ज्ञान, तंत्रज्ञान, कृषी अवजारे, विविध शेती उत्पादने, पुस्तके, खते- बियाणे कंपन्यांसह पशुप्रदर्शन आणि धान्य खरेदी- विक्रीची दालने या ठिकाणी आहेत. येत्या गुरुवारपर्यंत (ता. १५) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत हा महोत्सव सुरू राहणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.