शेतकरी विकासासाठी कृषी महोत्सव फायदेशीर ः प्रा. शिंदे

नगर कृषी महोत्सव
नगर कृषी महोत्सव
नगर  ः तीन वर्षांत केंद्र व राज्य सरकारने शेतकरी विकासासाठी काम केले आहे. सरकारचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारे आहोत. शेतकरी ते ग्राहक चळवळीला प्राधान्य दिले जात आहे. मध्यस्थी बंद करण्यासाठी कायदा केला आहे. कृषी महोत्सव शेती आणि शेतकरी विकासासाठी फायदेशीर ठरत आहे, असे मत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले. 
 
नगर येथे शुक्रवारपासून (ता. ३०) कृषी विभाग व आत्मा यांच्यातर्फे सुरू झालेल्या कृषी महोत्सवाचे प्रा. शिंदे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. खासदार दिलीप गांधी, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, विभागीय कृषी संचालक विजयकुमार इंगळे, महापौर सुरेखा कदम, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, डॉ. किरण कोकाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे, युवराज शेळके, कृषी विकास अधिकारी सुनील राठी या वेळी उपस्थित होते.
 
प्रा. शिंदे म्हणाले, की शेतकरी आता नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शेती करीत आहेत. त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचे प्रोत्साहन मिळत असून, तीन वर्षांत सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठे योगदान दिले आहे. वेगवेगळ्या योजनांचा लाभ देत कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले आहे. अधिकाऱ्यांनी मनावर घेतले, तर चांगला विकास साधता येतो, हे सातत्याने सिद्ध झाले आहे. सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले जात आहे. त्यातून शेतीमालाचा चांगला दर्जा सांभाळण्याची गरज आहे. मध्यस्थांची साखळी संपवण्यासाठी सरकारने कायदा केला असून, शेतकरी ते ग्राहक मोहिमेला प्राधान्य दिले जात आहे. जमीन आरोग्य पत्रिकाबाबत मात्र नाराजी व्यक्त करताना कृषी अधिकाऱ्यांनी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नाही. ते करावे, असे पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले. 
 
कृषी विभाग व आत्मा यांच्यातर्फे सुरू झालेल्या कृषी महोत्सवात प्रा. शिंदे यांच्यासह अन्य लोकांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाचे कौतुक केले. जिल्ह्यामध्ये पूर्वी हजारावर टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. आता मात्र अजूनही टॅंकर लागले नाही. ही किमया केवळ जलयुक्त शिवार अभियानामुळे झाली. अजूनही सुरू असलेल्या कामात लोकांनी योगदान देण्याचे प्रा. राम शिंदे यांनी आवाहन केले. 
 
या वेळी राहिबाई सोमा पोपरे (कोंभाळणे, ता. अकोले), दिलीप दत्तात्रेय शिंदे (जेऊर कुंभारी, ता. कोपरगाव), मदन भाऊसाहेब चौधरी (खंडाळा, श्रीरामपूर), तुकाराम काशीनाथ गुंजाळ (निमगावजाळी, ता. संगमनेर), भैरवनाथ सेंद्रिय शेती गट (भैरवनाथ नगर, श्रीरामपूर), ओम साईनाथ पशुपालन व दुग्ध उत्पादन गट (मु. कोल्हेवाडी, ता. संगमनेर), बळिराजा शेतकरी गट (पळवे, ता. पारनेर) आणि जय श्रीराम शेतकरी गट (राघोहिवरे, ता. पाथर्डी) यांचा कृषी विभागातर्फे गौरव करण्यात आला. भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी प्रस्ताविक केले. रियाज पठाण यांनी सूत्रसंचालन केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com