देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी होण्याच्या मार्गावर

देशाचे कृषिशास्त्रज्ञमंडळ, संशोधन संचालनालय संस्था, आयसीएआरमधील निम्म्या जागा जर रिकाम्या ठेवल्या जात असतील, तर कृषी शिक्षण व संशोधनाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही.यामुळे भारतीय शेतीची जगात पीछेहाट होईल. मोन्सॅन्टोसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांवरच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागेल. - डॉ. सी. डी. मायी, माजी अध्यक्ष,कृषिशास्त्रज्ञ भरती मंडळ
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी होण्याच्या मार्गावर
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी होण्याच्या मार्गावर

पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१ कृषी संशोधन संस्थांच्या संचालक पदांवर नियमित नियुक्त्याच केलेल्या नाहीत. तसेच देशभरातील कृषी संशोधन संस्थांसाठी शास्त्रज्ञांची निवड करण्याची जबाबदारी असलेल्या राष्ट्रीय कृषिशास्त्रज्ञ भरती मंडळालाच गेल्या वर्षभरापासून नियमित अध्यक्ष नाही. तसेच मंडळाच्या दोन सदस्यांची पदेही रिक्त आहेत. सरकारचा उदासीन दृष्टिकोन आणि बेपर्वाईमुळे देशातील कृषी संशोधनाची व्यवस्थाच खिळखिळी होण्याच्या मार्गावर असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. कृषिशास्त्रज्ञ भरती मंडळाचे सदस्य प्रा. अनिलकुमार श्रीवास्तव यांच्याकडे मंडळाच्या अध्यक्षपदाची तात्पुरती जबाबदारी आहे.  दोन सदस्यांची पदे रिक्तच आहेत. येत्या २२ ऑक्टोबरपर्यंत नव्या सदस्यांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. याचाच अर्थ चालू वर्षात मंडळाचे काम चालू होण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. मंडळाला सध्या कोणी वाली नसल्यामुळे १०३ पैकी ६१ संशोधन संस्थांना संचालक नाहीत. या संशोधन संस्थांचा कारभार भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) अखत्यारीत असतो. सध्या या परिषदेतील आठपैकी चार उपमहासंचालकांच्या जागा रिक्त आहेत.  कृषिशास्त्रज्ञ भरती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञांची निवड करण्याचा प्रघात आहे. परंतु, हा संकेत मोडून काढून या पदावर निवृत्त नोकरशहाला बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच, कृषिशास्त्रज्ञांच्या भरतीमध्ये अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्याच्या हेतूने मंडळाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव ऑगस्ट महिन्यातच मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार हे मंडळ आता `आयसीएआर`च्या नव्हे, तर कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीत असेल. मंडळाच्या सदस्यांची संख्या एकने वाढवून चार करण्यात आली आहे. दरम्यान, माजी केंद्रीय कृषी सचिव डॉ. एस. के. पटनाईक यांची कृषिशास्त्रज्ञ भरती मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात येणार असल्याची चर्चा दिल्लीतील शास्त्रज्ञांच्या वर्तुळात सुरू आहे. डॉ. पटनाईक हे कृषिमंत्री राधामोहन सिंह यांचे निकटवर्तीय आहेत.  प्रतिक्रिया केंद्रीय कृषी मंत्रालयातील आयएएस मंडळी नेहमीच `आयसीएआर`च्या महासंचालकाला दाबण्याचा प्रयत्न करीत असतात. यापूर्वीच्या काही महासंचालकांनी अशी दादागिरी चालू दिली नव्हती. मात्र, आता शास्त्रज्ञ निवड मंडळावरच माजी आयएएस अधिकारी नेमण्याच्या हालचाली चिंताजनक आहेत. कृषिशास्त्रज्ञांची भरती करण्याची जबाबदारी एक उत्तम शास्त्रज्ञच निभावू शकतो.  - डॉ. राजाराम देशमुख,  माजी कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी राष्ट्रीय स्तरावरील कृषी संशोधन संस्था किंवा कृषी विद्यापीठांना पांढरा हत्ती म्हणून हिणवायचे, शास्त्रज्ञांच्या जागा भरायच्या नाहीत, निधीत कपात करायची, असे उद्योग सध्या सुरू आहेत. देशाच्या कृषी इतिहासातील या मोठ्या घोडचुका आपण करीत असून, त्याचे परिणाम पुढील दहा वर्षांनंतर देशाला भोगावे लागतील.   - डॉ. किसनराव लवांडे,  माजी कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com