अकोला कृषी विद्यापीठाचा `झाड नाही, तर पदवीही नाही` उपक्रम

ग्लोबल वार्मिंगमुळे जागतिक स्तरावर चिंता वाढीस लागली आहे. त्याचे परिणाम पाहता वृक्षलागवड आणि संवर्धन गरजेचे आहे. त्यात खारीचा वाटा म्हणून येत्या शैक्षणिक सत्रापासून प्रवेशित विद्यार्थ्यांना वृक्षलागवड आणि संवर्धन सक्‍तीचे केले जाणार आहे. वृक्षसंवर्धनात विद्यार्थी अपयशी ठरल्यास अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्याला पदवी दिली जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. याला विद्यार्थी व पालकांचे सहकार्य अपेक्षित आहे. - डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः पर्यावरण संवर्धनासाठी सरसावलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रवेशाच्या वेळी लावलेले झाड न जगविल्यास अशा विद्यार्थ्याला पदवी न देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात पर्यावरण संरक्षणासाठी अशा प्रकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेणारे हे पहिलेच विद्यापीठ ठरले आहे. 

वृक्षतोडीमुळे जागतिक स्तरावर वाढते तापमान आणि त्याचा वातावरणावर झालेला परिणाम ही बाब नजीकच्या काळात चिंतेची ठरत आहे. ग्लोबल वार्मिंगचे दुष्परिणामही सद्यःस्थितीत अनुभवले जात आहेत. त्याची दखल घेत अकोला मुख्यालय असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने निसर्गसंवर्धनात खारीचा वाटा उचलण्याच्या प्रयत्नातून वृक्ष लागवड आणि संगोपन सक्‍तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून ही सक्‍ती केली जाणार आहे.

कृषी पदवी (बीएससी) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला कृषी विद्यापीठ परिसरात त्याच्या आवडीचे फळझाड लावण्यास सांगीतले जाईल. विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी रोलनंबर दिला जातो. तोच क्रमांक या झाडावर नमूद राहणार आहे. चार वर्षाचा कृषी पदवी अभ्यासक्रम आहे. या चार वर्षाच्या कालावधीत विद्यार्थ्यांने त्या झाडाच्या संगोपनावर लक्ष्य केंद्रित करावे, असे अपेक्षित आहे. 

अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्या झाडाचे संगोपन संबंधित विद्यार्थ्याने सुयोग्य रिरीतीने केले किंवा नाही याची पडताळणी केली जाईल. त्यानंतरच त्याला डिग्री (पदवी) दिली जाणार आहे. या माध्यमातून परिसर हिरवळाईने नटणार असून फळझाड लागवडीतून उत्पन्नाचा पर्यायदेखील विद्यापीठाला उपलब्ध होणार आहे. पदवी देण्याच्या कार्यपद्धतीत बदलाचे अधिकार विद्यापीठ प्रशासनला असतात त्यामुळे अशा प्रकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यकारी परिषदेच्या संमतीची गरज पडत नाही, असेही विद्यापीठ सूत्रांनी सांगीतले. या निर्णयाची अंमलबजावणी या वर्षीपासूनच केली जाणार आहे. विद्यार्थी व पालकांचा या उपक्रमाला कसा प्रतिसाद मिळतो, हे बघणे औत्स्युक्‍याचे ठरणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com