पुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स सीडस् डिलर्स असोसिएशनने विविध मागण्यासाठी जाहीर केलेल्या तीन दिवसाच्या बंदला जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी प्रतिसाद देत केंद्रे बंद ठेवली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी दुकांनामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. सरकारने तातडीने मागण्यांची दखल घेण्याची मागणी कृषी सेवा केंद्र चालकांकडून होत आहे.
कृषी विभागाने मान्यता दिलेल्या कंपन्यांकडून बियाणे सीलबंद स्थितीमध्ये खरेदी करून तसेच शेतकऱ्यांना विक्री करत आहेत. खरीपात सोयाबीन व इतर बियाणे पेरणीनंतर उगवत नसल्याच्या कारणास्तव विक्रेत्यास जबाबदार धरून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत कृषी आयुक्तालयाकडून अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
विक्रेता बियाणे उत्पादक, बियाणे प्रमाणीकरण करण्याचे काम करीत नसल्याने विक्रेत्यांवर या प्रकरणी गुन्हे नोंद करण्याची कार्यवाही रद्द करावी. सोयाबीन बियाणे उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यापुढे शेतकऱ्यांना गुणवत्ता पूर्ण बियाणे मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विक्रेत्यांचा कोणताही दोष नसताना त्यांच्यावर अन्यायकारक कार्यवाही होत असल्याने तीन दिवस बंद पुकारण्यात आला आहे. त्यास पहिल्याच दिवशी पुणे जिल्ह्यातील जवळपास सात हजार कृषी सेवा केंद्रांनी प्रतिसाद देऊन दुकाने बंद ठेवली. सकाळपासून दुकाने बंद ठेवल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते व किटकनाशके मिळण्यास काही प्रमाणात अडचणी आल्या.
पुणे जिल्हा डिलर असोसिएशनचे अध्यक्ष महेश मोरे म्हणाले,`` जिल्हयात बंदला संपूर्ण जिल्ह्यातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. तीन दिवस बंद ठेवणार आहे. या काळात कोणतेही दुकानदार निविष्ठांची विक्री करणार नाहीत. सरकारने मागण्या मान्य न केल्यास राज्य संघटनेकडून पुढील आदेश मिळाल्यानंतर पुढील दिशा ठरविली जाईल. हा महाराष्ट्र राज्य असोसिएशनचा निर्णय आहे. त्यामुळे यामध्ये सहभागी झालो आहोत.’’
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.