अमरावती ः लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवा म्हणून कृषी सेवा केंद्रांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाकडून करण्यात आली आहे. रब्बी हंगाम, कंपन्यांकडून होणारा खताचा पुरवठा, मृग बहरातील संत्र्याचे व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निविष्ठांची उपलब्धता करता यावी याकरिता हा निर्णय घेण्यात यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरासह काही तालुक्यांमध्ये सोमवार (ता. ८) पर्यंत लॉकडाउन लावण्यात आले आहे. या काळात किराणा, भाजीपाला या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्यामध्ये कृषी सेवा केंद्रांचा देखील समावेश आहे. मात्र कृषी सेवा केंद्रासंदर्भातील बंदी निर्णयाचा फेरविचार करून त्यांना लॉकडाउन काळात व्यवसायाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाने केली आहे.
संघाने दिलेल्या निवेदनानुसार, बियाणे व खते अत्यावश्यक सेवेत आहेत. याची मागणी शेतकऱ्यांकडून वर्षभर राहते. सध्या भाजीपाला, उन्हाळी भुईमूग, मूग या बियाण्यांची मागणी आहे. त्यासोबतच गहू, संत्रा, हरभरा व भाजीपाला या पिकांना खताचा डोस दिला जात आहे. खरीप नियोजन २०२१ करिता बियाणे नियोजन व सोयाबीन बियाण्यांच्या गाड्या उतरवून घेण्यासाठी दुकाने सुरू ठेवणे गरजेचे आहे.
या सर्व बाबींची दखल घेत त्यासोबतच खरीप २०२१ मध्ये निविष्ठा पुरवठ्याची साखळी विस्कळीत होऊ नये याकरिता लॉकडाउन काळात कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाने केली आहे. सेवा संघाचे अध्यक्ष विलास इंगोले, कोशाध्यक्ष वीरेंद्र शर्मा, सचिव नीलेश गांधी यांच्या नेतृत्वात या संदर्भाने निवेदन देण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.