शेतमाल तारण योजनेचा १० हजार शेतकऱ्यांना लाभ

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः राज्य कृषी पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेत यंदाच्या आर्थिक वर्षात सुमारे १० हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून, या माध्यमातून सुमारे साडेचार लाख क्विंटल शेतीमाल तारणातून ९० कोटींचे कर्ज शेतकऱ्यांनी घेतले आहे. योजना सुरू झाल्यापासून गेल्या २८ वर्षांतील तारण आणि कर्जाचा उच्चांक असल्याची माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. अशाप्रकारची तारण योजना राबविणारे देशातील एकमेव पणन मंडळ असल्याची नोंद केंद्र शासनाने घेतल्याचेही पवार यांनी सांगितले. 

पवार म्हणाले, की शेतीमाल काढणी हंगामात बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतमालाची आवक होऊन, बाजारभाव पडले जातात. हे टाळण्यासाठी पणन मंडळाच्या वतीने शेतमाल तारण योजना गेल्या २८ वर्षांपासून राबविण्यात येत आहे. टप्प्याटप्य्याने शेतकऱ्यांमध्ये ही योजना लोकप्रिय होऊ लागल्याने योजनेस शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात (२०१८-१९) गेल्या २८ वर्षांच्या तुलनेत उच्चांकी प्रतिसाद मिळाला आहे.

काय आहे योजना शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समिती अथवा वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलेल्या शेतीमालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंतची रक्कम ६ महिने कालावधीसाठी ६ टक्के व्याज दराने तारण कर्ज म्हणून देण्यात येते. ही योजना राबविण्यासाठी स्वनिधी उपलब्ध नसलेल्या बाजार समित्यांना ५ लाख इतका अग्रिम निधी पणन मंडळाकडून देण्यात येतो. या व उर्वरित बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या तारण कर्जाची १०० टक्के प्रतिपूर्ती पणन मंडळामार्फत करण्यात येते.

या शेतीमालाचा योजनेत समावेश या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफुल, हरभरा, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, वाघ्या घेवडा (राजमा), काजू बी, बेदाणा, सुपारी व हळद शेतमालासाठी तारण कर्ज देण्यात येते.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २० कोटींचा लाभ यंदाच्या हंगामामध्ये (२०१८-१९) तारण कर्ज योजनेत सोयाबीनची आवक जास्त प्रमाणात झाली असून सप्टेंबर – ऑक्टोबर २०१८ मध्ये सोयाबीनचे दर २८०० ते २९०० प्रतिक्विंटल होते. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ होऊन ते ३७०० रुपये क्विंटलपर्यंत वाढले होते. त्यामुळे वाढलेले बाजारभाव विचारात घेता चालू हंगामात शेतमाल तारण कर्ज योजनेत सोयाबीन ठेवलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल  ५०० ते ७०० रुपये इतके जादा दर मिळतील. यानुसार यंदाच्या हंगामात तारण योजनेत सोयाबीन तारण ठेवलेल्या ७ हजार ५७३ शेतकऱ्यांना सुमारे २० कोटी इतक्या रकमेचा निव्वळ फायदा झाला आहे.   यंदाच्या हंगामातील (ऑक्टोबर २०१८ ते १० मे २०१९) दृष्टिक्षेप  

  • सहभागी बाजार समित्यांची संख्या १४५
  • सहभागी शेतकऱ्यांची संख्या १० हजार ३२८
  • तारण शेतमालाचे वजन ४ लाख ३४ हजार १२२ क्विंटल.
  • तारण कर्जाची रक्कम ८९ कोटी ८९ लाख
  • पणन मंडळाने प्रतिपूर्ती केलेल्या तारण कर्जाची रक्कम ३९ कोटी ८७ लाख
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com