जलसंधारणाकडे पदे वर्ग करण्यास ‘कृषी’चा विरोध नाही

जलसंधारणाकडे पदे वर्ग करण्यास ‘कृषी’चा विरोध नाही

पुणे : औरंगाबादला नव्याने स्थापन झालेल्या जलसंधारण आयुक्तालयाकडे पुण्यातील कृषी खात्याची सध्याची पदे वर्ग करण्यास कोणताही विरोध नसल्याचे लेखी पत्र कृषी आयुक्तालयातील मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी दिले आहे.

औरंगाबादमध्ये मृद व जलसंधारण आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय घेताना त्यात पुण्यातील कृषी आयुक्तालयाकडील मृदसंधारण विभागदेखील वर्ग करण्यात आला आहे. ‘‘या विभागातील पदे वर्ग करण्यास नव्हे; तर सध्याच्या कर्मचाऱ्यांची गैरसोय करीत, नियमांची मोडतोड करून औरंगाबादला न पाठविण्याचा आमचा आग्रह आहे,’’ असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

‘‘ग्रामविकास व जलसंधारण मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार नवे आयुक्तालय स्थापन करण्यासाठी ३१ मे रोजी फेररचना करण्यात आली आहे. त्यानुसार औरंगाबादला जलसंधारण (लघुसिंचन), जलसंपदा विभाग थेट जोडले गेले आहेत. कृषी खात्याची ९९६७ पदेदेखील औरंगाबादच्या आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात आलेली आहेत. मात्र, हे वर्गीकरण होत असताना 'कृषी' आणि 'जलसंधारण' आयुक्तालयांचा आकृतिबंध जाहीर न केल्यामुळे तांत्रिक गोंधळ निर्माण झाल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

‘‘मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन संचालक कार्यालयात नव्या आकृतिबंधानुसार ९२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ ५७ पदे भरण्यात आली आहेत. ही पदे वर्ग करण्यास आमचा विरोध नाही. मात्र, सध्या कृषी विभागाचे कर्मचारी-अधिकारी म्हणून आम्ही औरंगाबादला जाण्याचे वैयक्तिक विकल्प दिलेले नसताना आणि आमची सेवाज्येष्ठता, पुढील पदोन्नतीची हमी, आकृतिबंध तयार नसताना पुण्यातून मध्येच औरंगाबादला जाण्याची वैयक्तिक पातळीवर कोणाचीही तयारी नाही,’’ असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मूळ आदेशानुसार कृषी विभागातील कर्मचारी व अधिकारी औरंगाबादला वर्ग करताना विकल्प घेण्याची तरतूद केली आहे. मात्र, सध्या कृषी मृदसंधारण विभागातील फक्त तीन कर्मचाऱ्यांनी औरंगाबादला जाण्याचा विकल्प दिला आहे. संचालक, सहसंचालक, सह उपसंचालक पदावर सध्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनीदेखील विकल्प दिलेले नाहीत. म्हणजेच या अधिकाऱ्यांना 'कृषी'मध्येच काम करण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट होते.

कृषी मृदसंधारण विभागात लवकरच निवृत्त होणारे कर्मचारी, महिला कर्मचारी तसेच कृषी आयुक्तालयातील सेवाज्येष्ठता सूचीत असलेले कर्मचारी औरंगाबादला त्वरित वर्ग होण्यास तयार नाहीत. सुधारित आकृतिबंधानंतरच ही समस्या सुटेल, असे कर्मचारी वर्गाचे म्हणणे आहे.

‘‘कृषी खात्यातून प्रतिनियुक्तीवर औरंगाबादला कर्मचारी वर्ग करताना सामान्य प्रशासन विभागाचे प्रतिनियुक्तीविषयक नियम पाळण्याचादेखील आमचा आग्रह आहे, असेही या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कृषी सचिव बिजयकुमार आणि कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह याबाबत काय भूमिका घेतात याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.

आस्थापना विभाग कब्जा करण्याची शक्यता कृषी आयुक्तालयातील सेंट्रल बिल्डिंगमधील मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन विभागाच्या जागेवर आस्थापना विभागाचा डोळा असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मृद विभाग औरंगाबादला वर्ग झाल्याचे गृहीत धरून सध्याची जागा रिकामी करून घेणे व तेथे कृषी आयुक्तालयातील आस्थापना विभाग थाटण्याच्या हालचाली चालू असल्याचे कर्मचारी सांगतात. आस्थापना विभाग सध्या पुण्याच्या साखर संकुल इमारतीत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com