पीकपेरा, उत्पादन माहितीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर होणार

पीकपेरा, उत्पादनासाठी  कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान
पीकपेरा, उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान

पुणे : राज्यातील पीकपेरा व शेतीमाल उत्पादनाची माहिती जमा करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) प्रणालीच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याचा मास्टर डेटादेखील तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली. कृषी विभागाच्या कामकाजाबाबत माहिती देताना आयुक्त म्हणाले की, खरीप किंवा रब्बी हंगामातील विविध पिकांखालील नेमके क्षेत्र काढणे किचकट असते. त्याचप्रमाणे उत्पादनाची माहिती किंवा अंदाज काढण्याचे पारंपरिक कामही काहीसे त्रासदायक आहे. यात आधुनिक तंत्राचे साह्य घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आधारावर कोणते नवे मॉडेल वापरता येईल, यावरदेखील काम सुरू आहे. उपग्रह प्रणालीने खरीप पिकांच्या माहितीची सध्या आम्ही पडताळणी (ग्राउंड ट्रथिंग) करीत आहोत. शेतीशाळांना मिळेल अद्ययावत माहिती पीकपेरा व उत्पादनाशी निगडित माहिती तसेच दुष्काळी स्थिती आणि पीकसल्ला अशा सर्व टप्प्यांवर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. त्यातून शेतकऱ्यांना विविध टप्प्यांवर मदत होऊ शकते. मात्र, नेमके काय करायचे, याबाबत प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी कामे सुरू आहेत. इस्रो, एमआरसॅक, नॅशनल सॅम्पल सर्व्हे, क्रॉपसॅप अशा सर्वच यंत्रणांकडील माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर आणणे व राज्यातील शेतीशाळांना या अद्ययावत माहितीशी जोडणे अशा अंगानदेखील विचार केला जात आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

शेतकरी सन्मान योजनेला वेग पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी जमा होत असलेल्या माहितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचा मास्टर डेटा तयार होण्यास मदत होते आहे. शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्याशी ही योजना जोडण्यासाठी कृषीसहित इतर विभागाची यंत्रणा चांगले प्रयत्न करीत आहे. यामुळे एक कोटी तीन लाख शेतकऱ्यांची माहिती भरली गेली आहे. यात ५५ लाख शेतकऱ्यांची खाती आधार संलग्न झालेली नव्हती. आता मात्र ही संख्या अवघी १९ लाखांवर आली आहे. यात देशात महाराष्ट्राने आघाडीने घेतली आहे. उर्वरित शेतकरीदेखील लवकरच आधार संलग्न होतील, असा विश्वास कृषी आयुक्तांनी व्यक्त केला. स्मार्ट प्रकल्पाचा करार पूर्ण शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिलेला महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अर्थात ‘स्मार्ट’ प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात करणार असल्याचे संकेत कृषी आयुक्तांनी दिले. “जागतिक बॅंकेसोबत सरकारी पातळीवर राहिलेली या प्रकल्पाच्या कराराची हस्तांतरण प्रक्रिया पार पडली आहे. आमची यंत्रणादेखील सज्ज असून, पुढील काही दिवसांत पहिल्या टप्प्यातील कामांना वेग येईल,” असे कृषी आयुक्तांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com