नाफेडकडून कांदा पुरवठा : कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर

नरेंद्रसिंह तोमर
नरेंद्रसिंह तोमर

नवी दिल्ली: देशात दुष्काळ आणि पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कांदा पुरवठा कमी होऊन देशातील अनेक भागांत दर ७० ते ८० रुपये किलोवर पोचले आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘नाफेड’सारख्या एजन्सीज कांदा पुरवठा वाढवतील त्यामुळे येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये कांदा दर नियंत्रणात येतील, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मंगळवारी (ता. २४) दिली.   येथे शेतकऱ्यांसाठी मोबाईल ॲपचे अनावरण करताना कृषिमंत्री तोमर बोलत होते. मंत्री तोमर म्हणाले, की येणाऱ्या काही दिवसांमध्ये कांद्याचे दर पुन्हा कमी होतील. ‘नाफेड’ बफर स्टॉकमधील कांदा कमी दरात विक्री करणार आहे. आमच्याकडे कांद्याचा पर्याप्त साठा उपलब्ध आहे. त्यामुळे कांदा दर लवकरच नियंत्रणात येतील. कांदा स्थितीविषयी सरकारला माहिती असून शेतकरी आणि ग्राहक या दोघांचेही हित जोपासल जाईल. जेव्हा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला कमी दर मिळतो आणि जेव्हा शेतमालासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतात तेव्हा सरकारला समन्वयाची भूमिका पार पाडावी लागते. आम्हाला परिस्थिती संपूर्ण माहिती असून उपाययोजना सुरू आहेत.   ‘‘महाराष्ट्र हे कांदा उत्पादनातील अग्रेसर राज्य आहे. परंतु, राज्यातील कांदा उत्पादक भागांत पुराचा फटका बसल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर झाला. परिणामी मागील एक महिन्यात बाजाराता पुरवठा कमी होऊन दराने अचानक उसळी घेतली. तसेच मागील आठवड्यात झालेल्या पावासानेही कांदापुरवठा प्रभावित झाला आहे. या सर्व परिस्थितीमुळे राजधानी दिल्लीत कांदा दर ७० ते ८० रुपये प्रतिकिलोवर पोचले,’’ अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.          देशातील शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा जवळपास बाजारात आला आहे आणि खरिपातील नवीन कांदा नोव्हेंबरपासून सुरू होईल. देशात मागील हंगामातील साठविलेल्या कांद्याचा पुरवाठा पुरेशा प्रमाणात झाला आहे. परंतु, पावसामुळे कांद्याची वाहतुक प्रभावित होत आहे. कांद्यांचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकार दिल्ली आणि इतर भागांत विविध उपाययोजना करत आहे. यामध्ये ‘नाफेड’चा बफर स्टॉक बाजारात आणत आहे. तसेच ‘एनसीसीएफ’ २२ रुपये प्रतिकिलोने कांदा विक्री करत आहे तर मदर डेअरीने दिल्लीत २३.९० रुपये प्रतिकिलोने कांदा विक्री सुरू केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.  कमी लागवडीमुळे दरात तेजी कांदा बाजार अभासकांच्या मते, यंदा महाराष्ट्र आणि इतर कांदा उत्पादक राज्यांमध्ये कमी पाऊस झाल्यामुळे लागवडीवर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक पट्ट्यतही दुष्काळ आणि पुरामुळे कांदा पिकाचे मोठे नुकासान झाले. यामुळे खरिप कांद्याचेही उत्पादन कमी होण्याची दाट शक्यता असल्याने कांदा दर तेजीत आहेत. सोबतच सतत कोसळणाऱ्या पावसाचाही परिणाम कांदा उत्पादनावर होत आहे. बफर स्टॉकमधील १६ हजार टन विक्री दिल्ली, त्रिपुरा आणि आंध्र प्रदेशने राज्य एजन्सीजना केंद्र सरकारच्या बफर स्टॉकमधील कांदा खेरदी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. केंद्र सरकारकडे ५६ हजार टन कांद्याचा बफर स्टॉक आहे. त्यापैकी आतापर्यंत १६ हजार टन कांदा बाजारात आणला आहे. तसेच दुसरीकडे केंद्राने कांदा निर्यात मुल्य विढविले असून अनुदानही काढले आहे. कांद्याचा होणार काळा बाजारही मोडीत काढला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com