एसटीद्वारे होणार शेतीमालाची वाहतूक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : शेतीमाल, भाजीपाला, फळे, अन्नधान्य आदी सर्व प्रकारच्या मालाची वाहतूक एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा शेतीमाल शहरी बाजारपेठेपर्यंत पोचविण्याच्या कामी या सेवेचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी महामंडळाच्या सुमारे ३ हजार जुन्या प्रवासी बसेसचे माल वाहतूक वाहनांमध्ये रूपांतर करण्यात येईल. तसेच विनावापर पडून असलेल्या राज्यभरातील जागांवर ३०१ गोदामांची निर्मिती केली जाणार असल्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले.

महामंडळाचे उत्पन्न वाढविणे आणि त्याचबरोबर लोकांना विविध सुविधा किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कल्पक उपाय योजना राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून स्वतंत्र वाहनांद्वारे माल वाहतूक करणे, विनावापर पडून असलेल्या जागांवर गोदामांची निर्मिती करणे आदींबाबत सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे सादरीकरण पार पडले. 

महामंडळाने प्रवासी वाहतुकीबरोबरच माल वाहतूक करण्याबाबत कायद्यात तरतूद आहे. आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या माल वाहतुकीच्या तरतुदीचा आता वापर करण्याचा निर्णय मंत्री श्री. रावते यांनी घेतला आहे. त्याआधारे रेल्वे माल वाहतुकीच्या धर्तीवर आता एसटीद्वारेही माल वाहतूक सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. माल वाहतुकीमुळे रेल्वे मोठ्या प्रमाणात फायद्यात आहे. माल वाहतूक सेवेसाठी स्वतंत्र वाहने वापरण्यात येणार आहेत.

सध्याच्या वापरातील प्रवासी वाहनांचे सर्व तांत्रिक बाबी पडताळून माल वाहतूक वाहनांमध्ये रूपांतर करण्यात येईल. त्यास परिवहन विभागाची रीतसर मान्यता घेण्यात येईल. त्यानंतर ही वाहने माल वाहतुकीसाठी वापरण्यात येतील. शेतीमाल, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, व्यापारी माल, स्टेशनरी आदी सर्व प्रकारच्या मान्यताप्राप्त मालाची वाहतूक करण्यात येईल. विशेष करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा माल शहरी बाजारपेठेपर्यंत पोचविण्याच्या कामी या सेवेचा वापर करण्यात येईल, असे मंत्री श्री. रावते यांनी सांगितले.

याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार कंपनीने सादरीकरण केले. त्यांनी सादर केलेल्या प्रस्तावात काही सुधारणा सूचविण्यात आल्या असून, हा प्रस्ताव लवकरच अंतिम करण्यात येईल. या सेवेमुळे ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी यांना व्यापारी लूट थांबून किफायतशीर दरात हक्काचे मालवाहतूक साधन मिळेल, असे मंत्री श्री. रावते म्हणाले.

महामंडळाच्या माल वाहतूक सेवेत रेशन धान्य, पोषण आहाराचे धान्य आदींची वाहतूक करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी महामंडळाच्या साधारण ३ हजार जुन्या प्रवासी बसेसचे माल वाहतूक वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येईल. काही नवीन माल वाहतूक वाहने खरेदी करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे.

सादरीकरणात राज्यातील ३०१ ठिकाणी गोदामे बांधता येऊ शकतील असे सांगण्यात आले.  बैठकीस महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, महामंडळाचे अधिकारी अशोक फळणीकर, माधव काळे, संजय गांजवे, सल्लागार कंपनीचे अधिकारी अमित पटजोशी, विवेक कुमार, रोहित चतुर्वेदी आदी उपस्थित होते.

संनियंत्रणासाठी स्वतंत्र विभाग प्रस्तावित माल वाहतूक आणि गोदामे यांचे संनियंत्रण करण्यासाठी महामंडळात सहव्यवस्थापकीय संचालक हे नवीन पद निर्माण करण्यात येणार असून, स्वतंत्र विभाग आणि स्वतंत्र कर्मचारीवर्गही नियुक्त करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com