`मार्केट डेव्हलपमेंट`साठी एकत्रित प्रयत्न हवेत

`मार्केट डेव्हलपमेंट`साठी एकत्रित प्रयत्न हवेत
`मार्केट डेव्हलपमेंट`साठी एकत्रित प्रयत्न हवेत

द्राक्षाचा चालू वर्षाचा हंगाम जवळ जवळ संपला आहे. बाजाराची गरज ओळखून द्राक्ष उत्पादकांनी चवीसह `रेसिड्यू मॅनेजमेंट`मध्ये केलेल्या लक्षणीय सुधारणा हे या हंगामाचे वैशिष्ट्य ठरले. कमी उत्पादकता आणि स्थिर बाजारामुळेही हा हंगाम लक्षात राहील. बाजाराचा अभ्यास करून त्यानुसार उत्पादन घेणे, बाजारातील फसवणुकीला पूर्ण पायबंद घालणे, भारतीय द्राक्षाचा ब्रॅण्ड तयार करणे ही येणाऱ्या हंगामापुढील आव्हाने आहेत. त्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. द्राक्षाच्या `मार्केट डेव्हलपमेंट`साठी यापुढे शासन, द्राक्ष बागायदार संघ यासह संबंधित सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे, हाच संदेश या हंगामाने दिला आहे. यंदाच्या हंगामात निर्यातीच्या द्राक्षांना किलोला ७० ते ९० रुपये व सरासरी ८० रुपये दर मिळतोय. तर देशांतर्गत बाजारात ३५ ते ५५ रुपये किलो व सरासरी ४५ रुपये दर मिळतोय. हे चित्र ३१ मार्चपर्यंतचं आहे. आता फार तर पाच टक्के माल शिल्लक आहे. मालाचा तुटवडा आणि मागणी जास्त अशी बाजाराची स्थिती आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्‍यात पिंपळगाव बसवंत परिसरात, नगर जिल्ह्यात लोणी, श्रीरामपूर, तसेच लातूर जिल्ह्यात आणि सांगली व सोलापूरच्या तुरळक काही भागात द्राक्ष बागा शिल्लक आहेत. त्या जास्तीत जास्त १५ एप्रिलपर्यंत आटोपतील अशी स्थिती आहे.   निर्यातीत वाढ यंदाच्या हंगामात ३१ मार्चपर्यंतची द्राक्ष निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २५६ कंटेनरने (२८११ टन) जास्त आहे. या तारखेपर्यंत देशातून युरोपकडे सुमारे ८२ हजार टन द्राक्ष निर्यात झाली. गेल्या वर्षी ती सुमारे ७९ हजार टन इतकी होती. यंदा भारतातील द्राक्ष उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट असल्याचे सांगितले जात होते. याही स्थितीत युरोपला जाणाऱ्या द्राक्ष निर्यातीत घट न होता उलट वाढच झाल्याचे दिसून आले आहे.  सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे संचालक व द्राक्ष निर्यातदार विलास शिंदे याबाबत म्हणाले, ``युरोपीय बाजारपेठेची क्षमता आणि भारतातून होणारी निर्यात याचा ताळमेळ शेवटपर्यंत बसला नाही. परिणामी निर्यातक्षम द्राक्षांचे दर यंदा निश्‍चित प्रमाणापेक्षा जास्त वाढले नाहीत. भारतीय द्राक्षांची स्पर्धा चिली, दक्षिण अफ्रिका, इजिप्त या देशांतील द्राक्षांशी होते. यंदाही भारतातून निर्यातीचे    प्रमाण जास्त आहे. युरोपात मागणी व दर स्थिर आहेत. इजिप्तची द्राक्षे दर वर्षी २० मे पासून युरोपीय बाजारात  सुरू होतात. यंदा तेथील हंगाम अर्ली असून तो माल    पाच मे पासून सुरू होण्याची शक्‍यता आहे. तो माल  सुरू झाल्यानंतर त्याचा भारतीय द्राक्षांच्या बाजारावर परिणाम होईल. याही स्थितीत भारतीय द्राक्षांना १५ एप्रिलच्या दरम्यान चांगले दर मिळण्याची शक्‍यता दिसत आहे.``  सध्या उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. दिल्लीसह देशांतर्गत प्रमुख बाजारपेठांतून द्राक्षांना मागणी वाढली आहे. मार्च महिन्याच्या  शेवटच्या आठवड्यात दिल्लीला पाठविलेल्या द्राक्षांना प्रति चार किलोच्या पेटीमागे २० ते १०० रुपयांदरम्यान वाढ झाली. बाजारात द्राक्षांचा तुटवडा असून मागणी वाढली आहे. शिल्लक राहिलेल्या द्राक्षांचे दर तेजीत राहण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.  यंदाचा द्राक्ष हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना या टप्प्यावर एकूणच हंगामाचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते. मागील वर्षी चांगला दर मिळाला, त्यावेळी मोठ्या प्रमाणावर पक्वतेचा कमी साखरेचा माल बाजारात आला. याचा फटका उशिराच्या मालाला बसला. हा माल छाटणीनंतर १८० ते २०० दिवस वेलीवर राहिला. परिणामी या बागांना यंदाच्या हंगामात फारसा माल आला नाही. चांगले दर मिळूनही वजने घटल्याने बहुतांश द्राक्ष उत्पादकांच्या हातात फारसं काही पडलं नाही. यंदा अर्लीच्या द्राक्षांना ऑक्‍टोबरमध्ये सलग १५ दिवस अवकाळी पावसाने झोडपले. त्यांनाही फटका बसला. बहुतांश टप्प्यांत माल कमी असूनही अपेक्षित दर मिळाला नाही. याचं कारण माल बाजारात असमान स्वरूपात आला. एकाच वेळी बहुसंख्य छाटण्या एकत्र आल्यास त्याचाही बाजारावर विपरित परिणाम होतो हे यातून दिसून आले. येत्या काळात मागील हंगामातील चुका सुधारून वाटचाल करावी लागणार आहे.  उत्पादकताही महत्त्वाची  द्राक्षाची चव आणि रेसिड्यू व्यवस्थापन यात यंदा लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून आले. अजूनही बेरी व्हेरियशन, काढणीनंतरचे व्यवस्थापन यात अनेक सुधारणा करण्यास वाव आहे. यंदा गुणवत्तेचा माल असूनही उत्पादकता कमी मिळाल्याने त्याचा बहुतांश द्राक्ष उत्पादकांना फटका बसला. त्यासाठी गुणवत्तेबरोबरच  एकरी १० ते १२ टन उत्पादकता कशी मिळेल याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी आपली जमीन, आपल्या भागातील हवामान आदी पाहूनच बहराच्या छाटण्या घेतल्या पाहिजेत.  बाजार व्यवस्थेचे आव्हान अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे म्हणाले की, येत्या काळात `मार्केट डेव्हलपमेंट'' हा महत्त्वाचा मुद्दा असेल. जागतिक पातळीवर भारतीय द्राक्षांचे ब्रॅंडिंग होण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न आवश्‍यक आहेत.  असुरक्षित बाजार व्यवस्था हे द्राक्षासमोर कायम आव्हान राहिले आहे. यंदाही कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून व्यापारी पळून गेल्याच्या घटना नाशिक, सांगली भागात घडल्या आहेत. बाजार व्यवस्थापनात आपण कमी पडतोय हेच या घटना दाखवताहेत. त्या त्या भागातील शेतकऱ्यांनी विक्रीसाठी एकत्र येणे आणि दर व व्यवस्था ठरविणे हेच यावर उत्तर आहे. द्राक्ष उत्पादकांनी एकत्र येऊन विक्रीची संघटित (ऑर्गनाइज्ड) व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे. पुढील हंगामासाठी हाच विचार घेऊन सज्ज राहायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com