आपणच आपला करावा उद्धार

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पादनासाठी तसेच शेतमाल उत्पादनानंतर लागणाऱ्या सेवासुविधा-साहित्य पुरविले तर शेतकऱ्यांबरोबर उत्पादक कंपन्यांचे पण भले होणार आहे.
agrowon editorial
agrowon editorial

शेती फायद्याची करायची असेल, तर शेतकऱ्यांनी एकत्र यावे आणि पीक   पद्धतीनुसार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात, असा सल्ला राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. राज्यातील शेतीचा विचार केला तर ८२ टक्के क्षेत्र जिरायती आहे. ही शेती कसणारे ८५ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहे. जिरायती शेतीमध्ये सोयाबीन, कापूस या मुख्य पिकांबरोबर हंगामनिहाय धान्यपिके घेतली जातात. तर बागायती शेतीत ऊस, फळे, भाजीपाला अशी पीकपद्धती ठरलेली आहे. अल्पभूधारकांकडून शेती क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान वापर, यांत्रिकीकरणास बऱ्याच मर्यादा येतात. मजूरटंचाईने मजूरही मिळत नाहीत. त्यामुळे कुठलेच काम वेळेवर होत नाही. अशा शेतीतील कमी उत्पादन बाजारात नेऊन विकायचे म्हटले तर वाहतूक खर्च परवडत नाही. प्रक्रिया करण्यातही अडचणी येतात. मजूरटंचाई, शेतमालाची विक्री, कमी दर या समस्या बागायती शेतीतील फळे-फुले-भाजीपाला उत्पादकांना पण आहेत.

अशावेळी राज्यातील अल्प-अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी एकत्र आले तर शेतीतील उत्पादन घेण्यापासून ते पुढे प्रक्रिया असो की विक्री त्यांना सोयीची ठरणार आहे. अर्थात सध्याच्या शेतीतील अनेक समस्या शेतकरी एकत्र आले तर दूर होऊ शकतात. हे लक्षात घेऊन येथून पुढे गावनिहाय शेतमाल उत्पादनानुसार शेतकऱ्यांनी गट-समूह यांच्या माध्यमातून एकत्र यायला हवे. गावागावातील शेतकरी शेती विकासाच्या अनुषंगाने एकत्र आले तर गट-तट कमी होतील, वाद-विवाद टळून सर्वांच्या सहकार्याने प्रगतीचे वारे वाहू लागेल. 

दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा शेतकरी उत्पादक कंपन्यांचा आहे. राज्यात नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या दीड हजारावर आहेत. त्यांचे जाळे जिल्हा, तालुकानिहाय राज्यभर पसरलेले आहे. परंतु, हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच कंपन्या ते ज्या उद्देशाने निर्माण झाल्या त्यानुसार कार्य करीत आहेत. बाकीच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना तर आपली स्थापना नेमकी कशासाठी झाली, हे सुद्धा कळालेले नाही. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पादनासाठी तसेच शेतमाल उत्पादनानंतर लागणाऱ्या सेवा-साहित्य पुरविले (बॅकवर्ड अॅंड फॉरवर्ड लिंकेजेस) तर शेतकऱ्यांबरोबर त्यांच्या कंपन्यांचे पण भले होणार आहे. मोहाडी (जि. नाशिक) येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी आणि ग्राहक यांच्या गरजा हेरुन त्यांना सेवा-सुविधा पुरविते. नाशिक हा शेती क्षेत्रातील आघाडीवरचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात कांदा, टोमॅटो आदी भाजीपाला पिकांसह द्राक्ष, डाळिंब अशी उच्चमूल्य पिके घेतली जातात.

हिंगोली जिल्ह्यात गोदा फार्म ही शेतकरी उत्पादक कंपनी तर जिरायती भागात यशस्वीपणे काम करते आहे. या कंपन्यांचा आदर्श घेऊन शेतमाल कापूस असो सोयाबीन असो की द्राक्ष, डाळिंब असे पीकनिहाय  शेतकरी उत्पादक कंपन्यांनी राज्यभर काम करायला पाहिजेत. राज्यात प्रत्येक भागात अगदी तालुका, जिल्हानिहाय शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. तसेच ज्या भागात शेतकरी उत्पादक कंपनी नाही तेथे नव्याने स्थापन करून या कंपन्यांनी शेतमालाची विक्री साखळी अथवा मूल्यवर्धन साखळी विकसित करायला हवी. शासनाने शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रशिक्षण, आर्थिक मदतीपासून त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत, त्याची पूर्तता तत्काळ करायला पाहिजे. उसावर आधारित साखर कारखानदारी जशी ग्रामीण भागात विकसित झाली तसे काम प्रत्येक प्रमुख शेतमालाच्या बाबतीत राज्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com