‘असर’दार शिक्षणासाठी...

ग्रामीण भागातील दहावी पास-नापास झालेल्या अनेक मुलांना उपजीविकेसाठी शेतीत उतरण्यावाचून काहीही पर्याय नसतो. अशावेळी पाचवीपासून ते दहावीपर्यंत या मुलांना शेतीसाठीचे उपयुक्त ज्ञान मिळाले, तर त्याचा फायदा शेती या व्यवसायात त्यांना होऊ शकतो.
संपादकीय
संपादकीय

कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी पात्र ठरणार आहेत. याबाबतचा शासन आदेशही नुकताच जाहीर झाला असून, राज्य शासनाचा हा एक चांगला निर्णय म्हणावा लागेल. खरे तर कृषी शाखेचा विद्यार्थी माती, पाणी, पर्यावरण, हवामान, पिके (वनस्पती), प्राणी, जीव रसायन, जैव तंत्रज्ञान, पीक संरक्षण, कृषी अभियांत्रिकी आदी विषय शिकत असल्यामुळे तो विज्ञानाचा पदवीधर असतोच. कृषीचे अनेक विद्यार्थी हे पदवीत्तोर शिक्षण घेऊन संबंधित विषयातील ‘मास्टर’ही होतात. मागील काही वर्षांपासून १२ वी विज्ञान उत्तिर्ण झालेले विद्यार्थी वैद्यकीय शाखेनंतर कृषीलाच प्राधान्य देत आहेत. त्यामुळे बीएस्सी कृषीसाठी असलेल्या जागेच्या संख्येच्या चार, पाच पट अधिक अर्ज प्रवेशासाठी येत होते. कृषी शिक्षणाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून प्रवेशासाठी चाळणी लावावी लागली आहे. ‘सीईटी’च्या परीक्षेत उत्तम गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनाच आता कृषीला प्रवेश मिळत आहे. सीईटीद्वारे प्रवेशाने वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रमाणेच कृषी शिक्षणालाही प्रतिष्ठा लाभली आहे. अशाप्रकारे कृषी पदवीसाठी स्पर्धेतून प्रवेश आणि चार वर्षांत मिळविलेले विविध विषयांतील ज्ञानाचा फायदा शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना होऊ शकतो. आज आपण पाहतोय शालेय शिक्षणाचा दर्जा खूपच खालावलेला आहे. पाचवीच्या मुलाला दुसरीचे पुस्तक वाचता येत नाही. गणितात ७५ टक्क्यांहून अधिक मुलांना वजाबाकी आणि ७९ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येत नाही, असा ‘असर’चा अहवाल सांगतो. अशावेळी शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी कृषी पदवीधारक शिक्षकांचा उपयोग शिक्षण व्यवस्थेबरोबरच राज्य शासनाला होऊ शकतो. त्याचबरोबर कृषी पदवीधारकांनासुद्धा नोकरीचे एक वेगळे दालन शालेय शिक्षकांच्या माध्यमातून मिळणार आहे.

शाळेय शिक्षणात कषिशास्त्र विषयाचा समावेश करा, ही विद्यार्थी, शेतकरी आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक जाणकारांची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यावरही राज्य शासनाने गांभीर्याने विचार करायला हवा. शालेय शिक्षणात कृषीचे धडे मिळण्याबाबत सुमारे दशकभरापूर्वी आर. बी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने शालेय शिक्षणात कृषी शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करून कुठल्या वर्गाला काय शिकवायचे असा अभ्यासक्रमनिहाय अहवाल शासनाला दिलेला आहे. परंतु शहरी भागातील काही प्रस्थापित शाळाचालकांची लॉबी यांस विरोध करीत आहे.

त्याहूनही गंभीर बाब म्हणजे राज्य शासन या लॉबीपुढे सातत्याने झुकत असून, त्यामुळेच आजतागायत याबाबत निर्णय झालेला नाही. ग्रामीण भागात शालेय शिक्षणातून ‘ड्राप आउट’ होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५० टक्क्यांच्या वर आहे. ग्रामीण भागातील दहावी पास-नापास झालेल्या अनेक मुलांना उपजीविकेसाठी शेतीत उतरण्यावाचून काहीही पर्याय नसतो. अशा वेळी पाचवीपासून ते दहावीपर्यंत या मुलांना शेतीसाठीचे उपयुक्त ज्ञान मिळाले तर त्याचा फायदा शेती या व्यवसायात त्यांना होऊ शकतो. खेड्यातील अनेक मुलांना इंग्रजी, गणित हे विषय अवघड जातात. त्यामुळे या विषयांमध्ये दहावीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील अधिक असते. अशावेळी इंग्रजी, गणिताला पर्यायी कृषिशास्त्र विषय ठेवला तर ग्रामीण आणि शहरी भागातील मुलं ज्यांना जे जमतं अथवा ज्याची जी आवड आहे, असे विषय निवडून त्यात ज्ञान संपादन करू शकतात. या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने आता शालेय शिक्षणात कृषिशास्त्र हा विषय आणायलाच हवा. असे झाले तरच शालेय शिक्षण अधिक असरदार ठरेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com