‘उन्हाळी’ गहू

बदलते हवामान आणि बाजारपेठेच्या बदलत्या ट्रेंडचा अभ्यास करून, तसेच उपलब्ध संसाधने लक्षात घेऊन त्यानुसार पिकांची निवड शेतकरी करीत असतात.
agrowon editorial
agrowon editorial

शेतशिवारात आता उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. वेळेवर पेरणी झालेले गहू, हरभरा ही पिके अनुक्रमे घाटे, ओंब्या लागून पिवळी पडत आहेत. तुरीची काढणी, मळणी सुरू आहे. कापसाची उणंगवाडी झाली आहे. खरीप हंगामानंतरचे नापेर क्षेत्र तसेच तूर, कापसाची काढणी झालेल्या शेतांची उन्हाळी मशागत करून जमीन तापू देण्याची ही वेळ आहे. पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून उन्हाळी पिकांच्या नियोजनाची हीच वेळ आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांत आत्तासुद्धा गहू पेरणीची लगबग सुरू आहे. नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वाशीम आदी जिल्ह्यांमध्ये कापसाच्या पऱ्हाट्या उपटून गहू पेरणीचा शेतकऱ्यांनी सपाटा लावला आहे. लागवडीची वेळ कधीच निघून गेल्यावरही शेतकऱ्यांचा या पिकाकडील कल पाहून ‘आता गहू लागवड थांबवा’ असा शेतकऱ्यांना सल्ला वाशीमचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना द्यावा लागला आहे. 

बदलते हवामान आणि बाजारपेठेच्या बदलत्या ट्रेंडचा अभ्यास करून तसेच उपलब्ध संसाधने लक्षात घेऊन पिकांची निवड शेतकरी अत्यंत कल्पकतेने करीत असतात. दुर्दैवाची बाब म्हणजे त्यानुषंगाने कृषी संशोधन आणि सल्ला मात्र शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाही. हे कृषी विद्यापीठांसह कृषी विभागाचेसुद्धा अपयश म्हणावे लागेल. खरिपात उशिरा पावसाचे आगमन, माघारी परतण्यास होत असलेला विलंब, दोन पावसांतील मोठे खंड यांस पूरक वाणांची मागणी शेतकऱ्यांकडून होतेय. परंतु, ते त्यांना मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान वाढत आहे. आता उन्हाळी हंगामात गव्हाची पेरणी वाढत असल्याचीदेखील अनेक कारणे आहेत. मागील पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे. गव्हात आंतरमशागतीची कामे फारशी करावी लागत नाहीत. गव्हावर रोग-किडींचा प्रादुर्भावही कमीच होतो. त्यामुळे फवारणीचा खर्च आणि कष्टही नाहीत. गव्हाची पेरणी तसेच काढणी-मळणी यंत्राने होत असल्याने मजूरटंचाईच्या झळा शेतकऱ्यांना बसत नाहीत.

महत्त्वाचे म्हणजे तीळ, भुईमूग आणि मूग अशा काही उन्हाळी पिकांचा पर्याय शेतकऱ्यांपुढे आहे. गव्हाच्या तुलनेत कमी पाणी लागणाऱ्या या पिकांची पेरणी करण्याचा सल्लाही कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना दिला जात आहे. परंतु, या पिकांना गव्हाच्या तुलनेत वन्यप्राण्यांचा त्रास अधिक आहे. रोही, हरीण, रानडुकरे आणि वानरे हे वन्यप्राणी ही उन्हाळ पिके हातीच लागू देत नाहीत, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. या पिकांची अत्यंत कमी उत्पादकता आणि मिळणाऱ्या कमी दरामुळे ती शेतकऱ्यांना परवडत नाहीत. त्यामुळे शेतकरी गहू लागवड करीत आहेत.

जिरायती गव्हाची पेरणी ऑक्टोबर-नोव्हेंबर, तर बागायती गव्हाची पेरणी उशिरात उशिरा १५ डिसेंबरपर्यंत करतात. यापेक्षा उशिरा गव्हाची पेरणी केल्यास उत्पादन थोडेफार घटते, हे शेतकऱ्यांना माहीत आहे. परंतु, त्यांच्याकडे गव्हास पर्यायी पिके उपलब्ध नाहीत. अशावेळी हवामान बदलानुसार विविध पिकांचे पर्याय, त्यांची जैविक-अजैविक ताण सहन करणारी, कमी-अधिक कालावधीची वाणं शेतकऱ्यांना उपलब्ध व्हायला हवीत. हवामान बदलानुसार पीकनिहाय लागवडीचा काळ आणि उत्पादन तंत्रातील बदलही शेतकऱ्यांना सांगावे लागतील. उन्हाळी हंगामात बहुतांश तेलबिया पिके घेतली जातात. या पिकांचे देशाच्या गरजेइतकेही उत्पादन होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आपल्याला आयात करावे लागते. अशावेळी तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ तसेच त्यांना रास्त दर देण्याबाबत शासनपातळीवर विचार व्हायला हवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com