अमूल्य ठेवा, जतन करा

राज्यात भाताच्या १७ हजारहून अधिक जाती होत्या, असे म्हटले जाते. आज यापैकी किती जाती शिल्लक आहेत, हा संशोधनाचा विषय ठरू शकतो.
agrowon editorial
agrowon editorial

आपला देश विविधतेने नटलेला आहे. येथे अनेक जाती, धर्म, पंथांचे लोक एकत्र राहतात. महत्त्वाचे म्हणजे येथे विभागनिहाय भाषा, वेशभूषा, खाद्यसंस्कृती बदलते. शेतीतही पूर्वी खूपच वैविध्य होते. या देशात जसे दर दहा मैलावर भाषा बदलते तसेच पीकपद्धती आणि पारंपरिक पिकांचे वाण पण बदलत होते. एकट्या महाराष्ट्रात भात पिकाच्या १७ हजारहून अधिक जाती होत्या. परंतु, हरितक्रांतीत अन्नधान्यासह अनेक पिकांमध्ये संकरित, सुधारित वाणांचा आपण स्वीकार केला. देशाची भूक भागविण्यासाठी ते गरजेचेही होते. परंतु, या देशातील पारंपरिक पिके, त्यांचे देशी वाण जपत आपण हरितक्रांतीचा स्वीकार करायला हवा होता. तसे न होता अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी आपण अनेक पारंपरिक पिकांचे देशी वाण नष्ट केले आहेत. १७ हजारहून अधिक भात जातींपैकी आज राज्यात किती जाती शिल्लक आहेत, हा खरे तर संशोधनाचा विषय ठरू शकतो. जे भाताचे झाले, तेच इतर तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया पिकांचे झाले आहे. त्यामुळेच जे काही पारंपरिक पिके, त्यांचे देशी वाण आज शिल्लक आहेत, त्यांच्या संवर्धनाची चळवळ उभी करावी लागेल, असे मत पर्यावरणतज्ज्ञ डॉ. देबल देब यांनी नुकतेच व्यक्त केले आहे. 

हरितक्रांतीने आपल्या देशाला अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले. परंतु, या देशातील शेतकऱ्यांना मात्र पूर्णपणे परावलंबी केले आहे. पूर्वी बियाणे विकत आणून शेती केली जात नव्हती. रासायनिक निविष्ठा तर नव्हत्याच, त्यामुळे त्या वापरण्याचा प्रश्नच नव्हता. शेतकरीच पारंपरिक पिकांच्या देशी वाणांचे संवर्धन करीत होते. अशा बियाण्याचे हस्तांतर एका शेतकऱ्याकडून दुसऱ्याकडे होत होते. देशी वाण काटक होते. विविध प्रकारचा जैविक-अजैविक ताण सहन करण्याची शक्ती त्यांच्यात होती. हे वाणं कीड-रोगासही बळी पडत नव्हते. स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि वातावरण यांच्याशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता चांगली होती. महत्त्वाचे म्हणजे या वाणांचे उत्पादित धान्य सशक्त आणि अत्यंत पोषक होते. काही शेतकऱ्यांनी तर आपला अनुभव आणि अभ्यासातून देशी वाणांतून अधिक उत्पादनक्षम, कीड-रोगास कमी बळी पडणारे सुधारित वाणंदेखील विकसित केले आहेत. परंतु, देशी वाण तसेच शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या सुधारित वाणांच्या गुणवैशिष्ट्यांची कुठेही शास्त्रशुद्ध नोंद करण्यात आली नाही. त्याचा फायदा अनेक बियाणे कंपन्यांनी घेऊन शेतकऱ्यांच्या या ज्ञानावरच सुधारित, संकरित जाती विकसित केल्या. त्यांचे पेटंट स्वतःच्या नावे घेऊन या कंपन्या गब्बर झाल्या आहेत. खरे तर हा सर्व प्रकार म्हणजे शेतकरी संशोधकांचा अपमान, तर तथाकथित वैज्ञानिकांचे हे अपयश असल्याचे मत डॉ. देब व्यक्त करतात. 

आता हवामान बदलाचा काळ आहे. वाढत्या नैसर्गिक आपत्तीत आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संकरित, जीएम वाणांचा टिकाव लागेनासा झाला आहे. आपली पारंपरिक पिके, देशी वाणं अशा परिस्थितीत टिकून त्यांचे नुकसान कमी होईल, असे मत काही तज्ज्ञ व्यक्त करतात. अशा वेळी देशी वाणं नष्ट होत असतील, तर ते देशाला परवडणारे नाही. आपल्या राज्यासह देशभर काही शेतकरी, त्यांचे गट, समूह, संघटना देशी वाणांचे संवर्धन करीत आहेत. परंतु, हे प्रमाण खूपच कमी आहे. देशी वाणांचे बियाणे संवर्धनाची मोहीम ही गावागावांत पोचायला हवी. देशी वाणांच्या बियाण्यांचा अमूल्य ठेवा, नष्ट होत असताना याच्या संवर्धनासाठी केंद्र, राज्य शासनाचे ठोस असे धोरण दिसत नाही. शासनाच्या ठोस धोरणाशिवाय देशी वाणसंवर्धन मोहिमेला बळ मिळणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com