सावधान! वणवा पेटतोय...

वन समृद्ध असेल तर शेती समृद्ध होते. वनांचा आणि शेतीचा असा थेट संबंध आहे, हे लक्षात घेऊन सर्वांनीच आगीपासून वनांचे संरक्षण करायला हवे.
संपादकीय
संपादकीय

चा र दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील मानूर-देवळीपाडा या गावाजवळील डोंगराला वणवा लागून त्यात वनसंपदेचे मोठे नुकसान झाले. रात्री अचानक डोंगरावर लागलेली आग पाहून जवळील पाड्यातील आदिवासी बांधव धावले. आग विझविण्यासाठी त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले, यात त्यांना यशही आले, त्यामुळे होणारे अधिकचे नुकसान टळले. राज्यात फेब्रुवारी ते मे या उन्हाळ्याच्या दिवसांत वणवे लागत असतात किंवा जाणीवपूर्वक लावले जातात. पेटलेला वणवा विझविण्यासाठीचे प्रयत्न क्वचितच होतात. त्यामुळे याची व्याप्ती आणि त्यात होणारे नुकसानही वाढत जाते. जंगल, डोंगराळ भागांत सर्वत्रच लागत असलेल्या वणव्यांची माध्यमामधूनही फारशी चर्चा होत नाही. वन विभागासह शासनही ही बाब गंभीरतेने घेत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस वणव्यांचे संकट हे अधिक गडद होत चालले आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत बहुतांश वन कुरणे वाळलेली असतात. जंगलातील झाडांची पानगळ झालेली असते. वाळलेला पालापाचोळा सर्वत्र पसरलेला असतो. मार्च ते मे या महिन्यांमध्ये वावटळीचे प्रमाण अधिक असते. ही सर्व परिस्थिती वणवा लागण्यास पोषक असते. अशा वेळी पडलेल्या एक ठिणगीचे रूपांतर वणव्यात होते. वणव्यामध्ये चराऊ कुरणे जळून खाक होतात. जंगलातील साग, साल, बांबू, खैर, चंदन आदी मौल्यवान वनवृक्षांसह असंख्य दुर्मीळ वनौषधी नष्ट होतात. आगीच्या चपेटमध्ये येऊन अनेक वन्यजीवांना आपले प्राण गमवावे लागतात. डोंगराळ भागात अनेक आदिवासी बांधव शेती करतात. अशा शेतीलाही वणव्याच्या झळा बसतात. अशा शेतातील पिके, बांधावरची वनवृक्षे, फळझाडे, गोठ्यातील जनावरे वणव्याच्या आगीत होरपळतात. वणव्यामुळे केवळ वनसंपदा अथवा वन्यजीवच नष्ट होत नाहीत तर डोंगराळ भागातील शेती-शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होते. पेटलेला वणवा आटोक्यात आणणे हे अत्यंत अवघड काम आहे. त्यामुळे तो पेटूच नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यायला हवी.   

जोराच्या वादळात झाडांच्या फांद्याचे एकमेकांना घर्षण होऊन अथवा वीज पडून नैसर्गिकरीत्या वणवा लागतो. परंतु आपल्याकडील बहुतांश वणवे हे अनैसर्गिक कारणांमुळे लागत असून, त्यास त्या परिसरातील मानवच जबाबदार असतो. मानवाकडून कधी अनवधानाने, तर बहुतांश वेळा मुद्दाम वणवा लावला जातो. डोंगराळ भागात शेती करण्यासाठी, गवताची अधिक वाढ होण्यासाठी, वन्यप्राण्यांना हाकलून देण्यासाठी, वन गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी वनाला आग लावली जाते. तर कधी राब जाळताना शेतकऱ्यांकडून योग्य दक्षता घेतली गेली नाही तरी वणवा पेटतो. आगीचा इशारा देणारे वायरलेस सेंसरचे जाळे उभारून कमी खर्चात आगीची माहिती मिळविली जाऊ शकते. परंतु आग लागू नये म्हणून पूर्वापार चालत आलेल्या जाळरेषा आणि आग लागल्यानंतर विझविण्यासाठी झाडांच्या फांद्या याच पद्धतीवर आजही वनखाते अवलंबून असल्याचे दिसून येते. राज्यात प्रत्येक वनक्षेत्राचा सुधारित आग संरक्षण आराखडा तयार करायला हवा. अशा आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीतून राज्यात वणव्याचे प्रमाण घटू शकते. या आराखड्यामध्ये प्रतिबंधात्मक तसेच नियंत्रणात्मक उपाययोजना असायला हव्यात. याबरोबरच वणव्याबाबत स्थानिक लोकांच्या निष्काळजीपणाबद्दल त्यांचे प्रबोधन वाढवायला हवे. वणव्यामध्ये त्यांची जबाबदारी आणि कर्तव्ये काय आहेत, हेही त्यांना सांगावे लागेल. गावाजवळच्या वनाला आग लागल्यानंतर गावकऱ्यांच्या सहकार्याने ती विझविणे, हे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर बंधनकारक आहे. यात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारायला हवा. वन समृद्ध असेल तर शेती समृद्ध होते. वनांचा आणि शेतीचा असा थेट संबंध आहे, हे लक्षात घेऊन सर्वांनीच आगीपासून वनांचे संरक्षण करायला हवे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com