एकात्मिक शेती हाच खरा आधार

नैसर्गिक आपत्तींनी हंगामी पिके नष्ट झाली की इतर उत्पन्नाचे स्त्रोत नसल्याने शेतकरी उध्वस्त होतो. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसायांची जोड देणे आता गरजेचेच झाले आहे.
agrowon editorial
agrowon editorial

शेती हा व्यवसाय पूर्वीपासूनच जोखीमयुक्त आहे. परंतू अलिकडच्या हवामान बदलाच्या काळात ही जोखीम फारच वाढलेली आहे. शेतीचे योग्य नियोजन केले तरी वाढत्या नैसर्गिक आपत्तींनी उत्पादन हाती लागेल की नाही, याची काहीही शाश्वती मिळत नाही. मागील काही वर्षांपासून हंगाम खरीप असो की रब्बी शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाकडून हिरावून घेतला जात आहे शेतकऱ्यांवर केवळ नैसर्गिक आपत्तींचेच संकट नाही तर अपार कष्ट अन् वारेमाप पैसा खर्च करुन पिकविलेला शेतमाल बाजारात नेला तर तेथे त्याची प्रचंड लूट होते. शेवटी उत्पादन खर्च तर सोडाच शेतमाल वाहतूक खर्च देखील निघणार नाही, एवढ्या कमी दरात शेतमाल विकावा लागतो. असा तोट्याचा व्यवसाय वर्षानुवर्षे अनेक शेतकरी त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे इतर काही पर्यायी साधन नसल्यामुळे करताहेत. दुर्दैवी बाब म्हणजे शेती या व्यवसायात प्रत्यक्ष घाम गाळणारा शेतकरी सोडून इतर सर्व गब्बर होताना दिसतात. शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांचे उत्पादक, विक्रेते, शेतमालाची खरेदी-विक्री करणारे व्यापारी, मध्यस्थ एवढेच नव्हे तर तोट्याच्या व्यवसायाचे तथाकथित सल्लागार-मार्गदर्शक (कन्स्लटंट) या सर्वांची दुकानदारी अगदी व्यवस्थित सुरु आहे. यात नागवला जातोय तो फक्त शेतकरी!

अशा एकंदर परिस्थितीमध्ये शेती या व्यवसायातील जोखीम कमी कशी करता येईल, हे आधी पहावे लागणार आहे. शेती क्षेत्र कमी असो की अधिक, बागायती असो की जिरायती त्यामध्ये एक अथवा दोनच पिके घेण्यापेक्षा हंगामनिहाय विविध पिके शेतकऱ्यांनी घ्यायला हवीत. शेतीत जेवढी पिके जास्त तेवढे जोखमीचे प्रमाण कमी, हे लक्षात घ्यायला हवे. पिकांची पेरणी करताना आंतरपीक, मिश्रपीक पद्धतींचा अवलंब करायला हवा. नैसर्गिक आपत्तींनी हंगामी पिके नष्ट झाली की शेतीस कुठल्याही जोडव्यवसायाची साथ नसलेला शेतकरी इतर उत्पन्नाचे स्त्रोत नसल्याने उध्वस्त होतो. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसायांची जोड देणे आता गरजेचेच झाले आहे. शेतीसोबत करण्यासारखे दुग्धव्यवसाय, कोंबडीपालन, शेळी-मेंढीपालन, मधूमक्षिका पालन, मत्स्यशेती, रेशीम शेती, अळिंबी संवर्धन असे अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. बदलत्या हवामानाचा परिणाम पूरक व्यवसायांवर देखील होतो. परंतू यामध्ये पिकांच्या तुलनेत नुकसानीचे प्रमाण कमी आहे. महत्वाचे म्हणजे पूरक व्यवसायांतून त्यांच्या उत्पादनांनुसार दररोज, आठवड्याला, महिन्याला अशा ठराविक अंतराने पैसा मिळत राहतो. कुटुंब चालविण्याबरोबर इतरही खर्चासाठी अशा पैशाचा उपयोग होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक विवंचना जाणवत नाही. 

राज्यातील कृषी विद्यापीठांनी प्रयोगातून एकात्मिक शेतीच्या विविध पद्धती विकसित केल्या आहेत. याशिवाय अनेक शेतकऱ्यांनी अभ्यास अन् अनुभवातून विविध पिके आणि त्यास जोडून उत्तमप्रकारे करता येतील अशा एक-दोन पूरक व्यवसायांचे शाश्वत मॉडेल्स विकसित केले आहेत. कृषी विद्यापीठांचे अथवा शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या एखाद्या मॉडेल्सचा थेट अथवा त्यात आपल्या गरजेनुसार बदल करीत प्रत्येकच शेतकऱ्यांनी अवलंब करायला हवा. जवळपास सर्वच पूरक व्यवसायांमध्ये नव्याने उतरताना शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शनाची गरज असते. याची पूर्तता व्यापक प्रमाणावरील प्रशिक्षण कार्यक्रमातून कृषी विभागाने करायला हवी. शेतीपूरक व्यवसायांबाबत शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या पण शेतकऱ्यांपर्यंत पोचवाव्या लागतील. शिवाय नवीन व्यवसाय सुरु करायचा म्हटले तर भांडवलाची गरज लागते. याकरीता शासनासह बॅंकांनी सहकार्य करायला हवे. येथून पुढे एकात्मिक शेती हा शेतकऱ्यांना शाश्वत आधार ठरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com