पेरणी ‘हिरव्या स्वप्नांची’! 

खरीप हंगामात पेरणी करताना जमिनीत किती ओल आहे आणि वर आकाशात किती ढग आहेत, याचा अंदाज घेऊन शेतकरी पेरणीला लागतो.
agrowon editorial
agrowon editorial

मृग नक्षत्र लागल्यापासून राज्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यापूर्वी देखील तौक्ते आणि यास चक्रीवादळामुळे राज्याच्या बऱ्याच भागात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे मृग नक्षत्राच्या पावसाने जमिनीत बऱ्यापैकी ओल झालेली आहे. असे असले तरी राज्याचा पूर्व भाग, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत पावसाची उघडीप आहे. त्यातच मागील दोन दिवसांपासून मॉन्सूनला फारसे पोषक वातावरण नसल्याने त्याचा वेग थोडा मंदावला आहे. त्यामुळे ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असा सल्ला कृषी आयुक्तालयाने दिला आहे. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड पडल्यास पेरणी वाया जाऊ शकते. त्यामुळे पेरणीची घाई करू नये, असे कृषी विभाग सांगून मोकळे झाले असले तरी शेतकऱ्यांनी पेरणी नक्की कधी करायची, हा खरा प्रश्‍न आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हवामान शास्त्र विभागाचे वेदर स्टेशन्स हे महसूल मंडळाच्या ठिकाणी आहेत. त्यातीलही बहुतांश स्टेशन्समध्ये पावसाची नोंद नीट होत नाही. त्यातच मागील काही वर्षांपासून गावात पाऊस असेल, तर शेतात नसतो अन् शेतात असेल तर गावात नसतो. अशावेळी गावोगावच्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतशिवारात ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाला की नाही, हे शेतकऱ्यांना कोण आणि कसे सांगणार, हाही प्रश्‍न आहे. 

पेरनीला येळ नगं, चला चला रे गड्यानू  फाटं आजा गचकला, पन ठिवा झाकून मयत  पेरणीच्या काळात घरात कुणी मरण पावले तरी मढ झाकून पेरणी केली पाहिजे, असे शेतकऱ्यांमध्ये बोलले जाते. कवयित्री सुरेखा शहा यांच्या ‘पेरनी’ कवितेतील या ओळी तेच सांगतात. महत्त्वाचे म्हणजे नेमकी कधी पेरणी करायची, यासाठी तो कुणाच्या सल्ल्याची वाट पाहत बसत नाही. पेरणी करताना जमिनीत किती ओल आहे आणि वर आकाशात किती ढग आहेत, याचा अंदाज घेऊन तो पेरणीला लागतो. त्यामुळेच मृगाच्या चांगला पाऊस ज्या भागात झाला तेथे खरीप पेरण्यांना चांगलाच वेग आला आहे. दिवसभर पेरणी केल्यावर संध्याकाळी जेव्हा रिमझिम पाऊस बरसतो तेव्हा पेर साधल्याचा आनंद केवळ शेतकरी अन् शेतकरीच अनुभवू शकतो.   

बीज मातीत पेरता, खाण सोन्याची त्या भासें  रोप रोप लावताना, चिखलाची उटी माखे  खरे तर शेतात कुठल्याही पिकांचे बीज नाही तर ‘हिरवं स्वप्न’ शेतकरी पेरत असतो. परंतु त्याचं हे हिरवं स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी कुणाचीच साथ त्यास मिळताना दिसत नाही. देशभरासाठी १०१ टक्का पावसाचा अंदाज सांगणारे भारतीय हवामानशास्त्र विभाग नेमके पावसाचे खंड कुठे, कसे पडणार? अतिवृष्टी कुठे, कधी होणार हे सांगत नाही. त्यामुळे पाऊसमान चांगले असो की नसो, राज्याच्या काही भागांत काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट दरवर्षीच येते. कृषी विद्यापीठे, कृषी विभाग, खासगी निविष्ठा कंपन्या यांची जबाबदारी शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा तसेच उच्च तंत्रज्ञान पुरविण्याची आहे. परंतु निविष्ठांचा दर्जा आणि प्रगत लागवड तंत्राच्या अवलंबाबाबत काय परिस्थिती आहे, हे आपण सर्व जण जाणून आहोत. पीक उगवून आले तरी अतिवृष्टी, पावसाचा खंड कीड-रोगांचे आक्रमण, तणांचा प्रादुर्भाव असे हल्ले त्यावर चालूच असतात. यातून हाती आलेले उत्पादन विक्रीस नेले तर बाजारातील सर्वच घटकांकडून त्याची लूट होते. या सर्व दुष्टचक्रात शेतकऱ्यांनी पाहिलेले हिरवे स्वप्न मात्र विरून जाते. चला तर शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न साकार करण्याचा संकल्प सर्व जण करूया! 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com