कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर एप्रिल, मे, जून हे तीन महिने देशभर कडक लॉकडाउन होते. या काळात शहरांतील उद्योग-व्यवसाय बंद होते. उद्योग-व्यवसायातील मजूर-कामगार वर्ग, खासगी कंपन्यातील कंत्राटी तसेच तात्पुरता कामावरील कर्मचारी वर्ग यांचा रोजगार गेला. शहरातील पोट भरण्याचे साधनच हिरावल्याने बहुतांश कामगार-नोकरदार वर्गाने गावचा रस्ता धरला. यातील अनेकांची शेतीवाडी गावी आहे. पूर्वी त्यांची शेती मक्ता-बटाईने भावकीतील अथवा गावातील कोणी ना कोणी करत होते. मक्ता-बटाईने शेत कसणारे प्रत्यक्ष शेतमालक नसल्याने ते धुऱ्या-बांधाकडे, शेतरस्त्याकडे फारसे लक्ष देत नसत. त्यामुळे त्यावर काहींनी अतिक्रमण केले. परंतू लॉकडानमध्ये अनेक जण गावी परतल्याने त्यांच्या हे लक्षात येताच वाद-विवाद, मारामारीचे प्रकार वाढले. त्यातून पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण पण वाढत होते. ही बाब लातूरच्या पोलिस अधिक्षकांच्या लक्षात आली. त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन तंटे मिटविण्याची मोहीम आखली. त्याला बऱ्यापैकी यश देखील आले आहे. पोलिसांनी त्यांच्यावरील लॉकडाउन बंदोबस्ताच्या तणावात ५०० हून अधिक गावात जाऊन शेतीचे ३०६ तंटे मिटविण्याचे काम केले.
खरे तर शेताचे बांध कोरण्यावरून, शेतरस्त्याच्या समस्येवरुन भाऊबंदकी अथवा शेजारील शेतकऱ्यांमध्ये कायमच वाद सुरु असतात. वाढत्या वादविवादातून भांडणे-मारामाऱ्या होतात. अशा प्रकारच्या मारामाऱ्यात राज्यात काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. अशी प्रकरणे पुढे न्यायालयात जातात. तेथे खटले वर्षानुवर्षे चालतात. यांत दोन्ही पक्षांकडील शेतकरी कुटुंबांचा अमाप पैसा तर खर्च होतो वरून भयंकर मानसिक ताप देखील होत असतो. वादाचा मुद्दा अत्यंत किरकोळ असतो, पण क्षणीक रागाच्या भरात घडणाऱ्या घटनांमुळे राज्यात अनेक कुटुंबे उध्वस्त झालेली पाहावयास मिळतात. त्यामुळेच असे तंटे लॉकडाउन काळात वाढत असताना ते बांधावर जाऊन मिटविण्याच्या ‘लातूर पॅटर्न’चे कौतुक करावे तेव्हढे कमी आहे. लातूर पोलिसांना केवळ शेतीचे तंटेच मिटविले नाही तर वादविवाद करणाऱ्या शेतकऱ्यांची मने जुळविण्याचे देखील काम केले, हे या पॅटर्नचे मोठे यश म्हणावे लागेल.
शिक्षणात लातूरचा पॅटर्न प्रसिद्ध आहे. दहावी असो की बारावी लातूरच्या शिक्षण पॅटर्नमुळे गुणवत्तेत अव्वल येथीलच विद्यार्थी असतात. त्यामुळेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून खासकरुन विदर्भ, मराठवाड्याच्या ग्रामीण भागातून मुला-मुलींना शिक्षणासाठी लातूरलाच पाठविले जाते. शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा आदर्शही याच जिल्ह्याने राज्याला घालून दिला. दशकभरापूर्वी तत्कालिन लातूरचे जिल्हाधिकारी एकनाथ डवले (सध्याचे कृषी सचिव) यांनी जिल्ह्यातील अतिक्रमण असलेले शेतरस्ते लोकसहभागातून मोकळे करण्याचा निर्णय घेतला. एकमेकांना सहकार्य करीत त्यांनी अतिक्रमणमुक्त शेतरस्त्याची लोकचळवळ उभी केली. ही चळवळ त्यांच्यानंतरच्या प्रशासनानेही यशस्वीपणे राबविली. यांत जिल्ह्यातील हजारो किलोमीटर शेतरस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. ही चळवळ पुढे राज्यातील अनेक जिल्ह्यात राबवून तेथीलही रस्ते अतिक्रमण मुक्त झाले. शेतीसंबंधीत तंटे लोकसहभागातून मिटविण्याची लातूर पोलिसांनी मोहीम लॉकडाउन काळात हाती घेतली असली तरी ती कायमच सुरु राहायला पाहिजे. तसेच हा आदर्श राज्यभरातील पोलिसांनी घेऊन प्रत्येक जिल्ह्यात अशी मोहीम राबविली तर यातून बहुसंख्य तंटे गावातच मिटतील. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा पैसा, कष्ट अन् महत्वाचे म्हणजे मनस्ताप वाचेल. असे झाले तर गावागावांत सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे चांगले कामही पोलिसांकडून होईल.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.